मुंबई : शनिवारी निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. एकिकडे निवडणूक आयोगाच्या वतीने या महत्त्वाच्या घोषणा केल्या जात असतानाच देशातील राजकीय पटलावर मोठ्या हालचाली आणि प्रतिक्रियांची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं.

निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यानंतर छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे सवाल केले. राज्यात २१ ऑक्टोबरला मतदान होत असून २४ ऑक्टोबरला मतमोजणी होत आहे. त्यावर भुजबळ यांनी आक्षेप घेतला आहे. ईव्हीएमबाबत सुरुवातीपासूनच लोकांचा आक्षेप आहे. असं असतााना मतमोजणी आणि मतदानामध्ये तीन दिवसाचे अंतर का ठेवण्यात आले? दुसऱ्या दिवशी मतमोजणी का ठेवली नाही. आम्ही सत्तेत असतानाही निवडणुका व्हायच्या. तेव्हा दुसऱ्या दिवशी किंवा फारफार तर त्यानंतर मतमोजणी व्हायची. यावेळी मात्र मतमोजणीत तीन दिवसाचं अंतर ठेवण्यात आलं आहे, असं सांगतानाच सरकारला ईव्हीएममध्ये गडबड करायची तर नाही ना? अशी शंका कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

काही दिवसांपूर्वी ईव्हीएमबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांना एकत्र आणत पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये ईव्हीएमवर आक्षेप घेत मुंबईत निवडणूक प्रक्रियेविरोधात मोर्चा काढला जाणार होता. मात्र दरम्यानच्या काळात राज ठाकरेंना कोहिनूर प्रकरणी ईडीची नोटीस बजाविण्यात आली. २२ ऑगस्ट रोजी राज ठाकरेंनी तब्बल साडेआठ तास चौकशी करण्यात आली. त्यामुळे ईव्हीएमबाबत विरोधकांच्या आंदोलनाचे पुढे काही झाले याबाबत विचारणा केली असताना भुजबळांनी आपल्याला याबाबत काही माहिती नसल्याचं सांगितलं.

मतदान आणि मतमोजणीत ३ दिवसांचं अंतर गडबड करण्यासाठी का? भुजबळ