मुंबई, १४ जून | मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावून श्वेतपत्रिका काढली पाहिजे. तेव्हा कोणी कोणाला फूस लावली हे लोकांना स्पष्टपणे समजेल. आधी राज्याने मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवावे आणि कायदा करावा. त्यानंतर केंद्रात काय करायचं ते मी बघतो. संभाजीराजे यावर थेटपणे बोलणार नाहीत. ते जंटलमन आहेत. पण मराठा आरक्षणासाठी कुणाला कुठं गाठायचं हे मी बघतो, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.
ते सोमवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांची पुण्यात भेट झाली. यानंतर दोघांनीही प्रसारमाध्यमांशी एकत्रितपणे संवाद साधला. यावेळी उदयनराजे यांनी संभाजीराजे यांच्या कोल्हापुरातील मोर्चाला आपला पाठिंबा जाहीर केला. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न कायदेशीर मार्गाने सुटणार नाही. त्यासाठी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र आले पाहिजे, असे उदयनराजे यांनी म्हटले.
मुद्द्यांवर आधारित राजकारण केलं तर लोक पाठिंबा देतील. मुद्दे घेतले जात नाहीत तर समाजाच्या आधारे राजकारण केलं जात आहे. कारण नसताना इतकी मोठी दुफळी निर्माण केली आहे. न्यायालयावर तर माझा विश्वासच नाही,” असं उदयनराजेंनी यावेळी सांगितलं. उदयनराजे यांनी यावेळी संभाजीराजेंनी पुकारलेल्या मूक आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचं सांगितलं. त्यांनी काय करावं हा त्यांचा मुद्दा आहे, शेवटी मराठा आरक्षण हेच ध्येय आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.
News Title: Maratha Reservation Chhatrapati Udayanraje Chhatrapati Sambhajiraje Press Conference After Meet In Pune news updates.
