औरंगाबाद: ‘हिंदू जननायक’ ही उपाधी आमच्या पक्षाकडून आलेली नाही. ती एका वृत्तवाहिनीनं दिली आहे. हवं असल्यास त्यांना विचारा,’ असं सांगतानाच, ‘मला हिंदू जननायक म्हणू नका,’ असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केलं. मनसेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात झेंड्याचा रंग बदलल्यानंतर आणि हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे स्वीकारल्यानंतर राज ठाकरे यांनी मुंबईत बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोर्चा काढला. त्यानंतर सध्या ते मराठवाडा दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद इथं आज त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी राज ठाकरे यांनी विविध विषयांवरील प्रश्नांना उत्तरं दिली.
यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामकरण विषयाला देखील हात घातला. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? असं म्हणत राज ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी बोलताना राज ठाकरे यांना शिवसेनेनवर अप्रत्यक्षपणे टीका केली. औरंगाबादचं नामाकरण करणे हा शिवसेनेचा अजेंडा होता? तुम्हीही तोच अजेंडा घेत आहात का? त्यावर बोलताना ते म्हणाले की, औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? चांगले बदल झाले पाहिजेत. अनेकजण आपली भूमिका बदलून सत्तेत गेले आहेत.
मी कधीच माझी भूमिका बदललेली नाही. पाकिस्तानी कलाकारांना विरोध हा पूर्वीपासूनच होता. त्यांना हाकलून देण्यातही आमचीच भूमिका महत्त्वाची होती. मशिदीवरील भोंगे बंद केले पाहिजेत हा मागणी आम्ही अनेक वर्षांपासून करतोय. जे स्वतःला हिंदुत्त्ववादी म्हणत होते. त्यांनीतरी असे कधी केले आहे का? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. आम्ही फक्त झेंडा बदलला आहे. आमची भूमिका तीच कायम आहे. राजकारणात झालेली पोकळी भरुन काढण्यासाठी आम्ही काही केलेले नाही, असे स्पष्ट करत धर्माला हात लावाल तर हिंदू म्हणून अंगावर जाईन, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. ते औरंगाबाद येथे बोलत होते. पक्षाचे धोरण आणि झेंडा बदलल्यानंतर राज ठाकरे हे प्रथमच मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत.
यावेळी त्यांनी पुलवामा’वर देखील भाष्य केलं. पुलवामा हल्ल्याला आज वर्ष पूर्ण होत आहे. त्यावेळी तुम्ही या हल्ल्यावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्या हल्ल्याबद्दल आज काय वाटतं?, असा प्रश्न राज यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर काय बोलणार त्याच्यावर आता? जे शहीद झाले त्यांचं दुर्दैव. तो हल्ला घडवून आणला आहे, अशी त्यावेळची चर्चा होती. तसे काही पुरावे समोर आले होते. जवानांना त्या मार्गानं घेऊन जाऊ नका, अशा सूचना असतानाही तरीही त्याच रस्त्यानं नेण्यात आलं होतं. त्याबद्दल मी प्रश्न विचारले होते,’ असं राज ठाकरे म्हणाले. ‘मला वाटतं जे घडायचं होतं, ते घडलं. जायचे ते लोक गेले. नवीन सरकार बसलं. सगळ्या गोष्टी घडल्या,’ अशा शब्दांत राज यांनी पुलवामातील हल्ल्यावर भाष्य केलं.
Web Title: MNS Chief Raj Thackeray over renaming Aurngabad to Sambhajinagar.
