नवी दिल्ली : महाराष्ट्रात लोकसभेच्या अनुषंगाने विविध भागांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जाहीर सभा होत असून याचा संपूर्ण खर्च काँग्रेस आणि अंशी[एनसीपीच्या प्रचारखर्चात टाकायला हवा, असे मत केंद्रीय रेल्वेमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते पीयूष गोयल यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन्ही पक्षांसाठी सरोगेटेड प्रचार करत आहे, अशी खरमरीत टीका देखील त्यांनी केली. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही टीका करताना महाराष्ट्रात ४० ते ४२ जागा भारतीय जनता पक्षाला मिळतील, असा दावा देखील केला.
पुढे ते म्हणाले की, निवडणूक आयोग अशा प्रचारास मान्यता देत नाही. तथापि, भारतीय जनता पक्षाला देशात २०१४ पेक्षा अधिक जागा मिळतील. हा आकडा सर्वांना आश्चर्य चकित करणारा असेल. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष-शिवसेनेचे काम खूपच चांगले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आमच्या युतीला एकूण ४२-४४ जागा मिळतील. देशभरात मतदार पुढे येऊन मोदी लाट दाखवून देत आहेत, असेही ते म्हणाले.
पीयूष गोयल म्हणाले की, राज ठाकरे पूर्वी एनसीपीच्या आणि काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते. राज ठाकरे यांनी स्वत: पंतप्रधान मोदी यांचे कौतुक देखील केले आहे. परंतु, ज्या प्रकारे त्यांनी आपली लोकप्रियता गमावली, त्यामुळे ते अशा प्रकारची पावले उचलत आहेत. राज ठाकरे यांच्या प्रचाराचा कोणताही परिणाम भारतीय जनता पक्ष-शिवसेनेवर होणार नाही. जी व्यक्ती एकही जागा लढवीत नाही त्यातून त्यांचा आपला पक्ष आणि स्वत:वर किती विश्वास आहे, हेच उघड होते. अर्थात, त्यांच्या सभेत विनोद-थट्टा अधिक होते. मुद्द्यांमध्ये काही दम असत नाही. पीयूष गोयल यांनी सांगितले की, विदर्भात आम्हाला कमी जागा येतील असे आमचे पत्रकार मित्र म्हणत होते. पण निवडणुका जवळ आल्यानंतर तेच म्हणू लागले की, आमचा विदर्भात मोठा विजय होईल. मराठवाडा व मुंबईमध्येही आम्हाला मोठा विजय मिळेल.
मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेचे आधुनिकीकरण, ट्रान्सहार्बर लाइन, कोस्टल रोडपासून ते अनेक कामे आमच्या सरकारने केली आहेत. मराठवाड्यात लातूरमध्ये विक्रमी वेळेत रेल्वे कोच फॅक्टरीचे काम सुरू केले आहे. अमेठीच्या रेल्वे कोच फॅक्टरीची तुलना करायची झाली तर लातूरमध्ये केवळ साठ दिवसांत मंजुरी देऊन भूमिपूजन केले. लवकरच काम सुरू होईल, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
