मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात न उतरताही राजकीय वातावरण ढवळून काढणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसणार असून मनसेचे दोन अंकी आमदार आगामी विधानसभा निवडणूकीत निवडून येतील’ असे भाकित ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मराटकर यांनी वर्तवले. नाशिक येथे चालू असलेल्या ज्योतिष संमेलनदरम्यान मराटकर यांनी हा अंदाज वर्तवला.
त्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्रिकेत रवी मंगळ हा मिथून राशीत आहे. धनू राशीतील गुरू त्यांचा प्रभाव वाढविणारा आहे. लोकसभेच्या निवडणुकांमध्येही त्यांच्या नेतृत्वाचा आणि भाषणाचा प्रभाव होता. त्यांच्या पत्रिकेतील गुरूचा सर्वाधिक प्रभाव विधानसभेत जाणवले. मनसेचे काही उमेदवार विधानसभेत विजयी होतील’ असेही मराटकर म्हणाले.
लोकसभा निवडणुकीचा निकाल केवळ ३ दिवसांवर येऊन ठेपला आहे. प्रत्येक उमेदवाराला, राजकीय पक्षांना आणि सामान्यांचे लक्ष सत्तास्थापनेकडे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर ज्योतिषी सिध्देश्वर मराटकर यांनी राजकीय नेत्यांच्या पत्रिकांचा अभ्यास करुन निकालाचा अंदाज वर्तविला आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या राजकीय वाटचालीबद्दल मोठी भविष्यवाणी केली. ‘मोदी मुक्त देश’ असा आक्रमक पवित्रा घेत राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात सभांद्वारे महाराष्ट्र पिंजून काढला. राज ठाकरे यांनी सभा घेतल्या आणि ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत भारतीय जनता पक्षाची पोलखोल केली. परंतु त्यांच्यावर टीकाही तितक्याच मोठ्या प्रमाणावर झाली. पक्ष भाड्याने देण्यापासून इंजिन घड्याळाबरोबर चालते, अशी टीका त्यांच्यावर झाली. राज ठाकरे यांच्या सभांचा फायदा अप्रत्यक्षपणे काँग्रेस-एनसीपीला झाला.
मनसेला सोबत घेण्यासाठी एनसीपीएचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हालचाली चालू असताना दूसरीकडे काँग्रेस मात्र सावध भूमिका घेत आहे. राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीय विरोधी भूमिकेमुळे मतांमध्ये याचा फटका बसू शकतो, यामुळे काँग्रेसने मनसेला सोबत घेण्याबाबत काही भूमिका घेतलेली नाही. दरम्यान विधानसभेत आघाडीसोबत जाणार की नाही याबाबत कोणाशीही चर्चा झाल्याची नसल्याचे वक्तव्य राज यांनी ठाण्यातील मेळाव्यात केले होते. दूसरीकडे येत्या आगामी विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीच्या छुप्या पाठिंब्याने मनसेचे आमदार चांगल्या संख्येने निवडणूक येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
