कर्जत: मी पुन्हा मुख्यमंत्री होणार असे म्हणत जनादेश यात्रा काढणारे मुख्यमंत्री पहिल्यांदाच पाहिले आहेत. पाच वर्ष कामे केली असती तर हि वेळ आली नसती. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे प्रदुषण मुख्य महाराष्ट्र करण्याची भाषा करत आहेत. मग पर्यावरण मंत्री रामदास कदम काय करत होते. पाच वर्षांत शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेली १५ कामे दाखवा असे म्हणत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेना भाजपवर निशाणा साधला. ते कर्जत येथे शिवस्वराज्य यात्रे दरम्यान आयोजीत सभेत बोलत होते.

आदित्य ठाकरे बेरोजगारमुक्त महाराष्ट्र करायचा म्हणतात. मग पाच वर्षे तुमच्या मंत्र्यांनी काय केले? उद्योग व पर्यावरण मंत्री तुमचेच होते ना? पाच वर्षांत शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्यात निर्णायक पंधरा कामे केली असतील ती त्यांनी दाखवावीत’ असे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले. कर्जतमध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या अंतिम टप्प्यानिमित्त शेळके बंधू कार्यालयाच्या सभागृहात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. अमोल कोल्हे बोलत होते.

राज्यात पाच वर्षांत 983 कारखाने बंद झाले. १ लाख ४३ हजार लहान मोठे उद्योग बंद झाले. यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले. मुख्यमंत्री यावर काही बोलायला तयार नाही. शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी विषय काढले याबद्दलही बोलायला तयार नाहीत. आदित्य ठाकरे आज नवा महाराष्ट्र घडवण्याची भाषा करत आहेत. मग पाच वर्ष शिवसेनेचे मंत्री नेमके काय करत होते असा सवाल कोल्हे यांनी यावेळी केला. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता मसुरकर, आमदार सुरेश लाड आणि खासदार सुनील तटकरे यांनीही उपस्थितांना संबोधित केले.

५ वर्ष उद्योगमंत्री सेनेचेच; मग आदित्य यांनी बेरोजगारी कमी का केली नाही? डॉ. अमोल कोल्हे