सोलापूर: राज्यात सत्ता आल्यावर अवघ्या १० रुपयांमध्ये भरपेट जेवण देऊ, अशी घोषणा करणाऱ्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टोला लगावला होता. त्यावेळी एका सभेतील प्रचारात तुम्हाला राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाक करायला, असा खोचक सवाल शरद पवारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला होता. विधानसभा निवडणुकीच्या बार्शी येथील प्रचारसभेत पवारांनी शिवसेनेच्या त्या घोषणेवर टीका केलो होती.
यावेळी पवारांनी जाहीरनाम्यातील विषयांवरून शिवसेना-भारतीय जनता पक्षावर टीकेची झोड उठवली होती. विशेषत: त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या दहा रुपयांमध्ये सकस थाळी देण्याच्या घोषणेचा समाचार घेतला होता. यापूर्वी शिवसेनेकडून राज्यात एक रुपयात झुणका भाकर अशी योजना सुरु करण्यात आली होती. मात्र, पुढे त्याच काय झालं? झुणका भाकर केंद्रे बंद पडली आहेत. या केंद्रांची जागा हडपण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच आम्ही तुम्हाला राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाक करायला, असा खोचक सवालही त्यांनी विचारला होता.
आता एकायला येतंय की १० रुपयांत जेवणाची थाळी मिळेल. राज्यात कुठे आणि किती ठिकाणी ही थाळी देणार. तुम्हाला राज्य करायला सांगतोय की स्वयंपाक करायला सांगतोय हाच प्रश्न पडलाय. अन्नधान्याचा प्रश्न आहेच, पण त्यासोबतच राज्यात इतर देखील प्रश्न आहेत. pic.twitter.com/r9fbTICfyh
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 12, 2019
उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवरील आपल्या घोषणेप्रमाणे शिवसेनेच्या वचननाम्यात १० रुपयात सकस जेवणाची थाळी देण्याच आश्वासन दिलं होतं. शरद पवार यांनी बार्शी येथील उमेदवार निरंजन भूमकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभा घेतली होती आणि त्या सभेत बोलताना, शिवसेनेच्या १० रुपयात थाळी देण्याच्या योजनेचा समाचार घेतला. यापूर्वी शिवसेनेकडून १ रुपयात झुणका भाकर सुरू करण्यात आली होती. काय झालं त्याचं? झुणका भाकर केंद्र बंद पडली. मात्र, तेथील जागा हडपण्यात आल्या आहेत. त्या जागेवर इतर उद्योगधंदे सुरू असल्याचं पवार यांनी म्हटलं. तसेच, आम्ही तुम्हाला राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाक करायला, असे म्हणत १० रुपयातील थाळीवरुन शिवसेनेला टोला लगावला. दरम्यान, यापूर्वी अजित पवार यांनीही १० रुपयांच्या थाळीवरुन शिवसेनेला टोला लगावला होता.
मात्र उद्धव ठाकरेंना जाहीरनाम्यात वचन देताना आणि शरद पवारांना याच विषयावरून उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारताना याची अजिबात कल्पना नव्हती की निकालानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची आघाडी शिवसेनेसोबत महाविकास आघाडी स्थापन करून राज्यात सरकार स्थापन करून सत्तेत बसेल. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही १० रुपयात सकस आहार योजनेवरून कात्रीत सापडल्याचं दिसतं आहे.
