अहमदनगर: विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आल्यानं आरोप-प्रत्यारोपांना धार चढली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सर्वाधिक आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांवर हल्ले चढवत आहेत. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यावर तोफ डागताना पवार यांनी आज त्यांना बांगड्या भरण्याचा सल्ला दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पवार यांनी आज श्रीगोंद्यात जाहीर सभा घेतली. त्यावेळी पवार यांनी पाचपुते यांना लक्ष्य केलं. ‘पाचपुते यांना मी रयत शिक्षण संस्थेत सदस्य केले. पण, पाचपुते रयत शिक्षण संस्थेत बसून राजकारण करायला लागले होते. पाचपुते हे बिनकामाचे मंत्री होते. राष्ट्रवादीने त्यांना वनमंत्री, आदिवासी मंत्री केले. १३ वर्षं मंत्रिपद दिले. इतकी वर्षे मंत्रिपद मिळूनही त्यांना काही करता आले नसेल तर त्यांनी बांगड्या घातल्या पाहिजेत,’ अशी जहरी टीका पवार यांनी केली. पाचपुतेंनी खासगी कारखाने काढून शेतकऱ्यांचे पैसे थकविले.
यांना गृह खात्याचा राज्यमंत्री केलं. जाईल तिथे पोलिसांचा सॅल्युट मिळायचा. मंत्रिमंडळात वन खातं हे महत्वाचं खातं असतं. मी स्वतः वनमंत्री होतो. मुख्यमंत्री असताना गृह खाते कमी करुन वनखातं घेतलं. महाराष्ट्रात वनसंपत्ती वाढवल्याशिवाय पावसाचा, पाण्याचा आणि बाकीचा जो प्रश्न आहे तो सुटणार नाही. म्हणून मी स्वतः ते काम केले आहे असेही पवार म्हणाले.
कारखाने कितीही काढा परंतु इथल्या कामगाराचे पैसे आणि शेतकर्यांचं देणं द्या. ज्यांनी कष्टकरी शेतकऱ्यांनी आपला ऊस घालून वर्ष दोन वर्ष पैसे थकवले तर ती गोष्ट योग्य नाही. त्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची मेहनत करुन घाम गाळलेली पगाराची रक्कम त्याला मिळत नसेल. तर त्याची चुलही पेटत नाही. जो माणूस कष्ट करणार्या कामगाराची चुल न पेटवण्याचे काम जो माणूस करतो त्याला गरिबांचा तळतळाट लागतो आणि हा तळतळाट असला की त्याला यश घेता येत नाही अशी टीकाही पवार यांनी केली.
