सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूरस्थितीपेक्षा महाजनादेश यात्रेची काळजी आहे, मागील पाच वर्षात जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असते तर आज यात्रा काढण्याची गरज पडली नसती. सरकार पूरस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असून मुख्यमंत्र्यांनी उंटावरून शेळ्या राखणे बंद करावे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

रुपाली चाकणकर यांनी कोल्हापूर व सांगलीमधील पूरस्थितीची पाहणी केली आहे, यावेळी कागल, मुस्लिम बोर्डींग, चित्रदुर्ग मठ, बापट कॅम्प, जाधववाडी, कुंभार गल्ली आदि पूरग्रस्त भागाचा दौरा करून याठिकाणी थांबलेल्या पूरग्रस्तांची विचारपूस केली. मंत्री गिरीश महाजन सेल्फी काढण्यात दंग होते. तर महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे कुठेही फिरकल्या नाहीत. त्यामुळे आता जनताच सरकारला धडा शिकवेल, अशी टीकाही चाकणकर यांनी केली.

दरम्यान महाराष्ट्र सरकारने कोल्हापूर अन् सांगलीतील पूरग्रस्तांना गहू आणि तांदूळ स्वरुपात अन्नधान्य दिले आहे. पीडितांची भूक भागविण्यासाठी मदतीचा हात देऊ केला आहे. मात्र, सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या या मदत पॅकेटवरही शासनाने जाहिरातबाजी केली होती. सरकारकडून देण्यात येणाऱ्या या गहू आणि तांदुळाच्या पॅकींगवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो असलेले स्टीकर छापण्यात येत होते. तसेच, प्रांताधिकारी शिंगटे आणि तहसिलदार सुधाकर भोसले यांचे यांचीही नावे टाकून जाहिरातबाजी करण्यात आली होती.

लाखो लोकांचे घरदार आणि संपूर्ण संसाराचं उध्वस्त झाले आहेत. दरम्यान, मदतीचा ओघ संपूर्ण राज्यातून सुरु झाला आहे तर दुसऱ्याबाजूला उशिरा का होईना, पण प्रशासनाकडून बचाव कार्य देखील युद्धपातळीवर सुरु असून, त्यात अनेक स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. मात्र पूरग्रस्तांना सावरण्यासाठी अजून काही महिने जातील अशी शक्यता आहे. मात्र त्यांना अधिक वेळ देण्यापेक्षा फडणवीस लगेचच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जनादेश यात्रेला सुरुवात करणार आहेत आणि म्हणूनच त्यांच्यावर राष्ट्रवादीने टीका केली आहे.

फडणवीसांनी उंटावरून शेळ्या राखणे बंद करावं: रुपाली चाकणकर