सातारा : पुढे काय व्हायचं ते होऊद्या मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देतो, सातारा लोकसभा मतदारसंघातली फेरनिवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर घ्यावी अशी जाहीर मागणी एनसीपीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानानंतर मतमोजणीत अनेक मतदारसंघातल्या मतांमध्ये मोठा फरक असल्याच्या तक्रारी मोठ्याप्रमामांवर आल्या होत्या. ज्यानंतर समाज माध्यमांवर एक फेसबुक पोस्ट लिहून उदयनराजे भोसले यांनी ही जाहीर मागणी केली.
यासंदर्भात राज्यातल्या इतर उमेदवारांनी देखील केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. दरम्यान हा भारतीय लोकशाहीचाच घात आहे, काय व्हायचं ते होऊ द्या मी खासदारकीचा राजीनामा देतो सातारा लोकसभा मतदारसंघातली निवडणूक बॅलेटपेपरवर घ्या, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी एक फेसबुक पोस्टच सार्वजनिक लिहिली आहे.
जगातील अनेक प्रगत देशांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सामान्यांच्या खिशातून टॅक्सच्या माध्यमाने जाणाऱ्या पैशांचा ईव्हीएमसाठी अपव्यय चालला आहे. एक हजार मतदानासाठी बॅलेट पेपरसाठी एक हजार 300, तर ईव्हीएमवर मतदान घेण्यासाठी 33 हजार रुपयांचा खर्च येतो. या निवडणुकीतच ४५०० कोटींपेक्षा जास्त खर्च ईव्हीएमवर मतदान घेण्यासाठी केला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोणतीही मानवनिर्मित गोष्ट बनविणाऱ्याला त्यातील त्रुटी माहित असतात, त्यामध्ये कसे बदल करायचे हे माहित असते. अगदी कायद्यात देखील किती पळवाटा आहेत असेही उदयनराजेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाला जर ईव्हीएम एवढी सुरक्षित व तांत्रिकदृष्ट्या सक्षम वाटत असतील तर त्यांनी झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात देशभरात जी तफावत आली त्याबाबत खुलासा केला पाहिजे अशीही मागणी उदयनराजेंनी केली आहे.
