मुंबई: मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेलं महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार अखेर सत्तेत येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, त्यांच्यासोबत काँग्रेस -राष्ट्रवादीचे चार मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांना मंत्रिपद मिळणार असून, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते, अशी जोरदार चर्चा आहे. तीन तारखेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी माहितीसुद्धा खात्रीलायक सूत्रांकडून आता मिळाली आहे.
तत्पूर्वी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेवरून कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत होता. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तब्बल महिना उलटला होता तरी सत्ता स्थापनेचा पेच कायम होता. त्यात नक्की युतीचं सरकार स्थापन होणार की आघाडीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार याबद्दल देखील राजकीय अंदाज बांधले जाऊ लागले होते.
शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदासह सर्व सत्तापदांचं समान वाटप करण्याची मागणी लावून धरली. शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम असल्यानं भारतीय जनता पक्षाकडून इतर मार्गांचा वापर केला जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. त्याच पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार रवी राणा यांनी खळबळजनक दावा केला होता.
शिवसेनेचे २० ते २५ आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असा दावा रवी राणा यांनी केला होता. ‘मागील 5 वर्षांत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलं. त्यांनी राज्याची जबाबदारी अतिशय व्यवस्थितपणे सांभाळली. त्यामुळे पुन्हा एकदा तेच मुख्यमंत्री होतील,’ असा विश्वास त्यांनी आमदार रवी राणा व्यक्त केला होता. आमदार रवी राणा यांनी पत्नी नवनीत कौर राणा यांच्यासह आज राज्यपालांची भेट घेतली होती आणि भाजपाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे आजच्या घडामोडीवरून तरी आमदार रवी राणा तोंडघशी पडले आहेत, कारण शिवसेनेनेच पवारांच्या मदतीने भूकंप केला आहे.
