पंढरपूर : सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाचे विचार सोडून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर सरकार टिकवण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. यामुळे सरकार ५ वर्षे टिकू शकणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
आज #पंढरपूर येथे महाराष्ट्राचे #आराध्य_दैवत #परमात्मा_पांडुरंग आणि #रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. pic.twitter.com/fVc8K48Tp6
— Eknath Khadse (@EknathKhadseBJP) January 21, 2020
तत्पूर्वी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेच्या २०१४मधील प्रस्तावावर गौप्यस्फोट केला होता त्यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना २०१४ च्या निवडणुका स्वबळावर लढवल्या होत्या. तेव्हा युती नव्हती. भारतीय जनता पक्षाचं एकट्याच्या जीवावर सरकार स्थापन होतंय असं दिसताना, इतर पक्षांनी एकत्र येण्याची प्रक्रिया केली असावी. त्याबाबत पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं. सरकार मिळवण्यासाठी किंवा सरकारमध्ये येण्यासाठी असे विविध प्रयोग यापूर्वीही करण्यात आले होते. अशा स्थितीत पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं वक्तव्य जबाबदार आहे. त्यामध्ये तथ्य असेल. २०१९ मध्ये आम्ही युती म्हणून एकत्र लढलो. तरीही काही टोकाच्या मतभेदामुळे सरकार टिकू शकलं नाही. त्यामुळे आजचं महाविकास आघाडीचं सरकार निर्माण झालं”.
त्यानंतर ते म्हणाले, ‘ आजही शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे विचार आणि तत्व भिन्न असताना भारतीय जनता पक्षाविरोधात सत्ता स्थापन झाली. कदाचित तसा विचार २०१४ मध्येही झाला असावा. शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला अंधारात ठेवण्याचा प्रश्नच नाही कारण दोन्ही पक्ष २०१४ मध्ये वेगळे लढले होते. त्यामुळे वेगळे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य शिवसेनेला होते.
Web Title: Shivsena congress and NCP Mahavikas Aghadi will complete 5 years says BJP Leader Eknath Khadse.
