मुंबई: राज्यात सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी केली. त्यांनतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी तर अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर अजित पवार यांचे गटनेतेपद काढून टाकण्यात आले. यावर राजकीय वर्तुळात बराच गदारोळ माजला. तसेच अजित पवार यांनी पाठिंबा दिला तेव्हा ते राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते होते आणि आजही तेच नेते आहेत त्यांनी काढलेला व्हिप राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाळावाच लागेल” असंही रावासाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. या संबंधी भारतीय जनता पक्षाचे नेता रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांना अजूनही गटनेतेपदाचे अधिकार असल्याचे सांगितले.

तसेच संजय राऊतांनी जास्त बोलू नये, राऊतांना उपचाराची गरज आहे. त्यांना वेड्याच्या इस्पितळात दाखल करावं असंही रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. त्याचसोबत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुढील ५ वर्ष राज्याला स्थिर सरकार देतील. ज्या दिवशी राज्यपालांकडे भारतीय जनता पक्षाने सत्तास्थापनेचा दावा केला. त्यावेळी अजित पवार राष्ट्रवादीचे गटनेते होते. त्यांच्या ५४ आमदारांचे पत्र राज्यपालांना देण्यात आलं आहे. आजही अजित पवार हेच राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. त्यामुळे अजितदादा जो व्हिप देतील तोच व्हिप राष्ट्रवादीच्या आमदारांना लागू होणार आहे. अजित पवारांना सत्तास्थापनेचा पूर्णपणे अधिकार होता असंही दानवेंनी स्पष्ट केलं आहे.

दानवे म्हणाले, ”सध्या काय बोलावं आणि काय बोलू नये हे संजय राऊत यांना अजूनही समजत नाही. राजकीय नाट्यामध्ये शिवसेनेला त्यांचा नेताही शोधताही आला नाही. जे कपिल सिब्बल कोर्टामध्ये आज शिवसेनेची बाजू मांडत आहेत त्या कपिल सिब्बल यांनी राम हे काल्पनिक आहेत वास्तव नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यावेळी कपिल सिब्बल यांच्याबद्दल टीका करणारा लेख संजय राऊत यांनीच लिहिला होता. त्या लेखात कपिल सिब्बल यांचा उल्लेख माकड असा केला होता. आता तेच कपिल सिब्बल यांची मदत शिवसेना घेत आहे ” असाही आरोप दानवे यांनी केला.

राऊतांना उपचारासाठी वेड्याच्या इस्पितळात दाखल करावं: रावसाहेब दानवे