मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक नाट्यमय, तर काही आश्चर्यचकित करणाऱ्या घटना घडल्या आणि अखेर नव्यानं उद्यास आलेल्या महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झाले. त्यानंतर यात महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाकडून ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला. याच ‘ऑफर’च्या संदर्भाने शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. “पवारांच्या अनुभवाचा मोरंबा महाराष्ट्र चाखतोच आहे. या वेळी दिल्लीश्वरांना तो चाखता आला नाही. अजित पवारांचा पापडही त्यांना भाजता आला नाही. शेठ, काय हे! हा महाराष्ट्र आहे. पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल,” असा सल्ला देत शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाला चिमटे काढले आहेत.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे शिल्पकार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या मोदीभेटीबाबत केलेल्या गौप्यस्फोटाचा धागा पकडत शिवसेनेच्या ‘सामना’ या अग्रलेखातून पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. ‘पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले असे निवडणूक प्रचारात अमित शहा सांगत होते. ही शंका अमित शहा यांना असेल, तर मग कोणत्या अनुभवानाचा फायदा मोदी यांना अपेक्षित होता?, पवार यांचा अनुभव देशासाठी कामी यावा यासाठी मोदी-शहा यांना साडेपाच वर्षे का लागली?, पवार यांच्या अनुभवाचा मोरंबा महाराष्ट्र चाखत असून या वेळी दिल्लीश्वरांना तो चाखता आला नाही. अजित पवारांचा पापडही त्यांना भाजता आला नाही’, असा टोला लगावत, ‘शेठ, काय हे! असं म्हणत मोदींची खिल्ली उडवली आहे.

तसेच महाराष्ट्रात शिवरायांच्या विचारांचे राज्य येऊ नये हे त्यांचे ध्येय होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ द्यायचा नाही हा त्यांचा ‘कावा’ होता. पवारांच्या अनुभवाचा मोरंबा महाराष्ट्र चाखतोच आहे. या वेळी दिल्लीश्वरांना तो चाखता आला नाही. अजित पवारांचा पापडही त्यांना भाजता आला नाही. शेठ, काय हे! हा महाराष्ट्र आहे. पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल अशा इशाराही शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला दिला आहे.

शेठ, काय हे! हा महाराष्ट्र आहे, पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल: शिवसेना