रायगड: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवनेरी किल्ल्यावर आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर उपस्थित शिवप्रेमींना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. अजितदादा, आपण आधीच एकत्र यायला हवं होतं, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी शिवभक्तांशी संवाद साधताना बोलून दाखवली. ‘मी आणि अजितदादा कार्यक्रम पाहात होतो. त्यावेळी एक कार्यकर्ता मला वळून वळून सांगत होता, दादांना सांभाळा. त्यावर मी आता उत्तर देतो. अहो अजितदादा, आपण एवढी मधली वर्षे उगाच घालवली. उगाचच इतकी वर्षे वेगळं राहिलो. आपण आधीच एकत्र यायला हवं होतं, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“आता जे काही आम्ही एकत्र आलेलो आहोत, आता आम्ही जे काही चांगलं करायचं आहे ते करून दाखविल्याशिवाय राहणार नाही. एवढं एक वचन, एवढी एक शपथ जिजाऊ आणि शिवरायांच्या साक्षीने घेतो.”
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) February 19, 2020
महाविकास आघाडीचं सरकार हे माझं सरकार आहे ही भावना आज प्रत्येक गोर-गरीबांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळेच आज शिवजन्माच्या सोहळ्याचा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्याला गर्दी झाली आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे हे भाषण करत होते त्याचवेळी जमलेल्या गर्दीपैकी एकजण ओरडून म्हणाला ते शिवस्मारकाचं लवकर बघा. त्यावरही उद्धव ठाकरेंनी हसून दाद दिली आणि म्हणाले “होय सगळं बघतो. आज लोकांचं सरकार आलेलं आहे. त्यामुळे काळजी करु नका. शिवनेरी आणखी कशी सजावयची याकडे आम्ही लक्ष देतो आहोत. हे आपलं वैभव आहे”असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवनेरी किल्ल्याचा कायापालट आणि सुशोभिकरण करण्यासाठी २३ कोटी रुपये देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. शिवनेरीवरील गर्दी पाहता राज्यात खऱ्या अर्थाने रयतेचं राज्य आलंय हे स्पष्ट होतंय, असं पवार म्हणाले.
Web Title: Story Chief Minster Uddhav Thackeray comment on Maha Vikas Aghadi alliance at Shivneri Fort.
