उस्मानाबाद : ‘सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,’ असं वक्तव्य एका कीर्तनात केल्यानं वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केली आहे. यासंबंधी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.

दुसऱ्याबाजूला इंदुरीकर महाराजांचे समर्थक मोर्चे आणि आंदोलनाच्या तयारीत आहेत. सोशल मीडियावर तशी चर्चाही आहे. चलो अहमदनगर असा नारा समर्थकाकडून लगावला जात आहे. पण इंदुरीकर महाराजांनी आपल्या समर्थकांना असं काहीही करू नका अशी विनंती केली आहे. जे काय आहे ते कायद्याने सिद्ध होईल असंही ते म्हणाले आहेत. इंदुरीकर महाराजांनी चाहत्यांना विनंती करणारं एक पत्रक जारी केलं आहे. त्यात आपण कोणीही, कोठेही मोर्चा, रॅली, एकत्र जमणे, निवेदन देण्याचा प्रयत्न करू नये. आपण आपली बाजू कायदेशीररित्या शांततेच्या मार्गाने मांडणार आहे. तरी सर्वानी शांतता राखून सहकार्य करावं, अशी विनंती केली आहे.

विशेष म्हणजे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी वादात सापडलेल्या इंदुरीकर महाराज यांचे समर्थन केलं आहे. ‘नोटीस दिली म्हणजे गुन्हा दाखल होईल असे नाही. इंदुरीकर महाराजांवर राज्य सरकार गुन्हा दाखल करणार नाही, अशी माहितीही बच्चू कडू यांनी दिली आहे.

‘२ तासांच्या भाषणात एखादा शब्द चुकीचा जाऊ शकतो. तो माझ्याकडून किंवा इंदुरीकर महाराज यांच्याकडूनही जाऊ शकतो. आपल्या देशात एखादा शब्द पकडणे आणि तो दाखवणे ही चुकीची सवय लागली आहे, ती बदलणे गरजेचे आहे. कायद्या सगळ्यांसाठी सारखा आहे. त्यामुळे इंदुरीकरांनाही नोटीस दिली आहे. त्याची चौकशी होईल,’ असंही बचू कडू म्हणाले.

 

Web Title: Story Minister Bachhu Kadu indirectly supports Indurikar Maharaj.

२ तासांच्या भाषणात एखादा शब्द चुकीचा जाऊ शकतो: मंत्री बच्चू कडू