कोल्हापूर : आठवड्याभरापासून कोसळत असलेला मुसळधार पाऊस आणि पात्राबाहेर वाहणाऱ्या नद्यांनी दक्षिण महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर शहर-जिल्ह्यांची अवस्था बुधवारी आणखी भीषण केली. या दोन्ही शहरांना सोमवारपासून बसलेला महापुराचा विळखा बुधवारी आणखी आवळला गेला. हजारो बुडालेली घरे, पाण्याखाली गेलेले रस्ते-बाजारपेठा, ठप्प झालेले जनजीवन आणि मदतीसाठी सुरू असलेली विविध यंत्रणांची धडपड.. हेच विदारक चित्र या दोन्ही शहर- जिल्ह्य़ांमध्ये दिसत होते.
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्य़ांत आतापर्यंत १६ जणांचा बळी गेला आहे. पूरस्थितीमुळे बेघर झालेल्या दीड लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. कोल्हापूर, सातारा परिसरात अजूनही मुसळधार सुरू असल्याने परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती वर्तविली जात आहे. कृष्णा खोऱ्यातील पूरस्थितीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा अध्र्यावर सोडून तातडीने मुंबईत बुधवारी उच्चस्तरीय बैठकीत राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.
एरवी संथ वाहणाऱ्या कृष्णामाईने दोन दिवसांपूर्वी धोकापातळी ओलांडून गावठाणाला कवेत घेतले आणि सांगलीकरांच्या काळजाचा ठोका चुकला. अशा संकटाच्या वेळी अगदी खासदारापासून ते गावच्या पंचापर्यंतचे लोकप्रतिनिधी पक्षीय मतभेद महापुराच्या पाण्यात सोडून मदतीचा हात देत प्रशासनाच्या सोबतीने रस्त्यावर उतरले.
सांगलीसह जिल्ह्य़ातील कृष्णा-वारणा नदीच्या काठी असलेल्या ११७ गावांना महापुराचा फटका बसला असून नदीकाठी असलेल्या पूरबाधित लोकांना वाचविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण, टेरिटोरियल आर्मी आणि गाव पातळीवरील मंडळे प्रयत्नशील आहेत. आज अखेर सुमारे ६० हजार लोक आणि २० हजार जनावरांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
दरम्यान, महापुरामुळे सांगली आणि कोल्हापुरात दूध संकलन बंद करण्यात आले आहे. शिवाय मुंबईकडे येणाऱ्या पुणे-बंगळुरू महामार्गावर पाणी आल्याने उपलब्ध असलेले दूध मुंबईत पोहोचण्याची शक्यता नाही. तसेच काही ट्रक या महामार्गावर अडकून पडले आहेत. त्यामुळे गोकुळसारख्या सात लाख लिटर दूध वितरित करणाऱ्या कंपनीमध्ये आज दूधच न आल्याने नवी मुंबईतील डेअरीही आज बंद आहे. दरम्यान, चितळे कंपनीकडून पुणे, सांगली आणि नवी मुंबईला नियमित दूध पुरवठा सुरू राहणार आहे.
