मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने आपले इनकमिंग सुरू केले आहे. त्याचाच भाग म्हणून विजयी होऊ शकणाऱ्यांना शिवबंधन बांधण्याचे काम वेगात आले असून येत्या आठवड्यात बार्शीचे राष्ट्रवादीचे आ. दिलीप सोपल आणि बोईसरचे बहुजन विकास आघाडीचे आ. विलास तरे यांना शिवबंधन बांधण्याचे निश्चित झाले आहे.
राष्ट्रवादीचे आणखी २ आमदारही सेनेच्या वाटेवर आहेत.बार्शी विधानसभा शिवसेनेने मागितली आहे. भारतीय जनता पक्षदेखील त्यासाठी फार आग्रही नाही. २०१४ साली तेथून आयत्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर राजेंद्र मिरगणे उभे होते. मात्र त्यांना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळावर सहअध्यक्ष केले असून त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. राजा राऊत हे शिवसेनेत होते त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मात्र सोपल सेनेत गेले तर राऊत अपक्ष म्हणून उभे राहू शकतात.
सोपल यांनी त्यांचा आर्यन साखर कारखाना विकला, पण शेतकऱ्यांचे पैसे देणे बाकी आहे. त्यातून तक्रारी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर सोपल यांना शिवबंधन बांधायचे आहे. सोपल राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी भाजपवर पक्षफोडीवरून टीकास्त्र सोडलं आहे.
जयंत पाटील म्हणाले की, पक्ष बदलाचा बाजार भारतीय जनता पक्षाने सुरु केला आहे.वेगवेगळ्या माध्यमातून विरोधकांना संपवण्याचे प्रकार भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे. पवारसाहेबांनी पळून गेलेल्या नेत्यांना सगळं काही दिलं होत. खुर्चीशिवाय त्यांना कुठेही बसवलं नाही, तरी ते लोक पक्ष सोडून गेले आहेत. तसेच माध्यमात येणाऱ्या गोष्टींपेक्षा जमीनीवरील परिस्थिती आज वेगळी आहे याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी दिली. पवारांसारखा जाणता राजा आहे, शिवाय तरुण बहाद्दरांची फळी आमच्याकडे आहे, त्यातून आम्ही नवा महाराष्ट्र घडवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
