मुंबई: राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तास्थापनेचे अंतिम सूत्र ठरल्याची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षांसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाटून घेतले जाईल तर पूर्ण पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्रीपद हे काँग्रेसकडे राहील या निर्णयावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाल्याचे वृत्त आहे. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मिळालेल्या वृत्तानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे खासदार आणि सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय अमहमद पटेल यांच्यामध्ये मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

महाराष्ट्रात आकाराला येऊ घातलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसच्या संभाव्य आघाडीतही सत्तावाटपाचा अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यानुसार, महाशिवआघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीला प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार असून काँग्रेसला सलग ५ वर्षे उपमुख्यमंत्रिपद मिळणार आहे.

राज्यामधील सर्व महामंडळे आणि समित्यांचे समसमान वाटप केली जाईल असंही या बैठकीत ठरल्याचे समजते. तसेच कोणत्या व्यक्तीला मुख्यमंत्री निवडायचे हा निर्णय प्रत्येक पक्ष घेऊ शकतो असंही ठरलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठाकरे कुटुंबातील व्यक्तीला मुख्यमंत्रीपदावर बसवण्यास विरोध होत असल्याचे वृत्त होते. मात्र दोन्ही काँग्रेसने शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या निवडीबद्दल आमचा कोणताही आक्षेप नसल्याचे कळवले आहे. त्यामुळे शिवसेना कोणत्याही व्यक्तीला अडीच वर्षांसाठी या पदावर बसवू शकते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली. तसेच अहमद पटेल यांनी काँग्रेसची संस्कृती आणि सरकार स्थापनेतील अटीशर्तींची माहिती उद्धव ठाकरे यांना दिली. उद्धव ठाकरेंशी झालेल्या बैठकीनंतर अहमद पटेल हे दिल्लीला रवाना झाले. आता या बैठकीबाबतचा अहवाल ते सोनिया गांधी यांना देणार आहेत. त्यानंतर सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात पुढील वाटचालीबाबत फोनवरून चर्चा होऊ शकते.

ठरलं! शिवसेना-राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद तर काँग्रेसकडे उपमुख्यमंत्री