मुंबई: सत्तास्थापनेचा तिढा वाढला असून भारतीय जनता पक्षासाठी सर्व अशा जवळपास संपल्यात जमा आहेत. भारतीय जनता पक्षातील दिल्ली ते गल्ली’मधील नेत्यांची अवस्था पाहता आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ठाम भूमिका पाहता, भाजपने युतीत सत्ता स्थापनेची अपेक्षा जवळपास संपुष्टात आणली आहे. मात्र इतिहासात तोडफोडीच्या राजकारणाचा अनुभव असलेल्या खासदार नारायण राणे यांना बोलावून फडणवीसांनी त्यांच्यावर सरकार स्थापनेच्या शक्यता तपासण्याची जवाबदारी टाकल्याचे वृत्त आहे. त्यालाच अनुसरून आमदार नितेश राणे यांनी खासदार नारायण राणे यांचा फोटो ट्विट करत “अब आएगा मज़ा” असं ट्विट केलं आहे.

बहुमताचा आकडा १४५ आमदार जुळविताना नारायण राणेंना इतर पक्षातील आमदार गळाला लावावे लागणार आहे. मात्र यावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे. नारायण राणेंच्या वक्तव्याला किती गांभीर्याने घ्यायचं हा प्रश्न आहे, सध्याच्या काळात सगळे आमदार पक्षासोबत राहतील, जर एखाद्या पक्षातील आमदार फुटला, त्याठिकाणी निवडणुका लागल्या तर ज्या पक्षाचा आमदार फुटला त्याच पक्षाचा उमेदवार उभा राहील आणि अन्य दोन पक्ष त्याला पाठिंबा देतील. जर असं झालं तर ३ पक्षाचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराला कोणता माइकालाल हरवू शकत नाही असं आव्हान अजित पवार यांनी खासदार नारायण राणे यांना दिलं आहे.

आपल्याला सत्ता स्थापन करायची आहे, कामाला लागा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं असून सत्ता स्थापन करण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली आहे, असं सांगतानाच मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे. त्यामुळे भाजपची सत्ता येण्यासाठी मला जे काही करता येईल ते करेल, असं भारतीय जनता पक्ष नेते नारायण राणे यांनी स्पष्ट करून खळबळ उडवून दिली.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर नारायण राणे यांनी आज वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राणे यांनी हे विधान केलं. आम्ही राज्यात लवकरच भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन करू. मुख्यमंत्र्यांनी मला कामाला लागण्यास सांगितलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची सत्ता येण्यासाठी जे काही करता येईल ते करेल, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी माझ्यावरच का जबाबदारी दिली हे तुम्हाला मुख्यमंत्रीच सांगू शकतील, असं राणे म्हणाले. कुणाचे आमदार संपर्कात आहेत आणि नाहीत हे मी आताच सांगणार नाही. तशी माहिती देणं योग्य ठरणार नाही. नाही तर येणारे आमदारही घाबरून येणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.

नारायण राणे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘शिवसेना जे काही करत आहे नैतिकतेला धरून नाही. निवडणुकीपूर्वी युती झाली होती. आता हे नैतिकतेला धरून नाही. युती केली होती हेही वचन होतं. काँग्रेस -राष्ट्रवादीचे नेते तोंडावर एक बोलता आणि मागे एक बोलतात. सेनेला ते उल्लू बनवत आहे’, अशी टीका राणेंनी केली. तसंच शिवसेना ही काँग्रेससोबत जाणार नाही, असा विश्वासही राणेंनी व्यक्त केला.

भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सरकार स्थापन करण्यासाठी जे जे काही करत येईल ते ते करणार, असं राणेंनी स्पष्टपणे सांगितलं. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली ही दुर्दैवी बाब आहे. ‘फडणवीस यांनी सरकार स्थापन करण्याच्या कामाला लागा असं मला सांगितलं आहे. आम्ही जेव्हा राज्यपालांकडे जावू तेव्हा खाली हाताने जाणार नाही, आमच्याकडे १४५ जागांचं बहुमत असेल’, असा दावाही राणेंनी केला.

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला होता. महायुतीला बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपदावरुन वाद सुरु होता. या दोन्ही पक्षांचं आपसात काहीही ठरलं नाही. त्यामुळे शिवसेनेने भारतीय जनता पक्षापासून काहीही कल्पना न देता फारकत घेतली. त्यानंतर राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं. १०५ जागा जिंकलेल्या भारतीय जनता पक्षाने शिवसेनेने महायुती म्हणून निवडणूक लढवूनही सोबत येण्यास नकार दिल्याने त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्यास शुभेच्छा असं म्हणत असमर्थता दर्शवली.

भारतीय जनता पक्ष-शिवसेनेला राज्यपालांनी सत्ता स्थापनेचा दावा करण्याची संधी दिली होती. मात्र बहुमताचा आकडा नसल्यानं दोन्ही पक्षांना सरकार स्थापनेचा दावा करता आला नाही. शिवसेनेनं बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र राज्यपालांनी त्यांची मागणी फेटाळून लावली. यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीला संधी दिली. परंतु त्यांनाही बहुमतासाठी आवश्यक असणारा आकडा गाठता आला नाही. त्यांनीदेखील शिवसेनेप्रमाणेच मुदत वाढवून देण्याची विनंती केली. परंतु राज्यपालांनी त्यास नकार दिला. यानंतर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. आतापर्यंत राज्यात कधीही निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही.

आमदार फोडून कोण माइकालाल त्याला निवडून आणतो ते बघू; अजित पवारांचं राणेंना आव्हान