नागपूर: विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. युवा सेनाप्रमुख आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, ही शिवसैनिकांची भावना आहे. यावर सूचक मौन पाळत आदित्य मैदानात उतरले आहेत. आदित्य यांनी १८ जुलैपासून जळगावमधून जन आशीर्वाद यात्रा सुरू केली होती. या यात्रेद्वारे ते महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. सध्या या यात्रेचा तिसरा टप्पा सुरू असून ती नागपुरात पोहोचली आहे.

त्यावेळी पत्रकारांशी मोजक्या शब्दात संवाद साधला आणि प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न केला. भाजप सेना युतीबाबत मी काही बोलणार नाही. युतीबाबत जो काही निर्णय झाला आहे. तो मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झाला आहे. त्यामुळे युतीबाबत दोन्ही पक्षाचे प्रमुखचं बोलू शकतील. मी त्यांच्या समोर खूप लहान आहे, असे म्हणत शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युतीचा निर्णय दोन्ही पक्ष प्रमुख घेतील असे सांगितले.

जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज सुरवात झाली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरेंना युती बाबत प्रश्न करण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकांच्या वेळी युती जाहीर करताना जी पत्रकार परिषद झाली होती त्यात सर्व काही स्पष्ट करण्यात आले होते, तसंच आमची युती सत्तेसाठी नव्हे तर मुद्द्यांसाठी आहे असं देखील आदित्या यांनी म्हटलं. तसेच उपमुख्यमंत्री पदासंदर्भातला पेपर मी सध्या फोडणार नाही, निवडणूक लढवायची की नाही, निवडणूक कुठून लढवायची हे अजून निश्चित झाल नाही. जनता जी जबाबदारी देईल ती मी स्वीकारेन असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

शिवसेनेने मोर्चा काढला म्हणून पीक विम्याचे ९०७ कोटी रुपये १० लाख शेतकऱ्यांना मिळाले आहेत, असा दावाही त्यांनी केला आणि आर्थिक मंदी असून व्यापाऱ्यांना दिला देणे गरजेचे आहे, असे सांगितले. तुम्ही मुख्यमंत्री होणार काय? निवडणूक लढणार काय? असा प्रश्न आला असता हा पेपर फोडणार नाही, असे उत्तर देऊन त्यांनी पळवाट शोधली.

खंडणीखोर शिवसैनिकांवर कायद्यानुसार कारवाई होत आहे. शिवसेना त्यामध्ये येणार नाही, असे सांगून विरोधकांवर ईडीची कारवाई होत असल्याबद्दल त्यांनी निर्थक चर्चा करू नये, असे सांगून बोलण्याचे टाळले. मात्र, पुढील निवडणूक कर्जमुक्ती, पीक विमा, महिलांचा प्रश्न, दुष्काळमुक्त महाराष्ट्र या मुद्यांवर लढणार असल्याचे आदित्य यांनी सांगितले.

निवडणूक कर्जमुक्ती, पीक विमा, महिलांचे प्रश्न, दुष्काळमुक्त महाराष्ट्र मुद्यांवर लढणार: आदित्य ठाकरे