
Inflation Hike | मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशात महागाईने अनेक विक्रम मोडले आहेत. तसेच पुढेही महागाई वाढतच राहणार असेच संकेत मिळत आहेत. वास्तविक २०१४ मध्ये नरेंद्र मोदी महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांवरच निवडणूक जिंकले खरे, पण त्यानंतर ते महागाई – बेरोजगारी या मुद्यांवर चकार शब्दही काढत नाहीत.
विशेष म्हणजे २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत शहीद CRPF जवानांचे फोटो मंचावर लावून मतं मागताना त्यांना देखणे पहिले आहे. आता महागाई आणि बेरोजगारी शिगेला पोहोचल्याने ते राज्यांमधील निवडणुकीत बजरंगबलीच्या नावाने मतं मागत आहेत. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप हिंदू-मुस्लिम वादाला हवा देत राम मंदिराच्या नावाने मतं मागतील अशी शंका राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र दुसऱ्याबाजूला महागाईचा मुद्दा झाकला जाईल याची देखील काळजी घेतली जातं आहे.
महागड्या भाज्या आणि इतर खाद्यपदार्थ देखील महागले
महागड्या भाज्या आणि इतर खाद्यपदार्थांमुळे महागाईने जुलैमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, जुलैमध्ये किरकोळ महागाईचा दर १५ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. किरकोळ महागाई दर या महिन्यात ७.४४ टक्क्यांवर पोहोचला आहे. जूनमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) आधारित महागाई दर ४.८७ टक्के होता. तर गेल्या वर्षी जुलैमध्ये तो ६.७१ टक्के होता. यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये महागाई चा दर 7.79 टक्क्यांवर होता.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अन्नपदार्थांची महागाई जुलैमध्ये ११.५१ टक्के होती, तर गेल्या वर्षी जूनमध्ये ४.५५ टक्के आणि जुलैमध्ये ६.६९ टक्के होती. वार्षिक आधारावर भाजीपाला दरवाढीचा दर ३७.४३ टक्के होता, तर तृणधान्ये आणि त्याच्या उत्पादनांचा दर १३ टक्के होता.
ताज्या आकडेवारीमुळे रिझर्व्ह बँकेचे टेन्शन वाढले
किरकोळ महागाईच्या ताज्या आकडेवारीमुळे रिझर्व्ह बँकेचे टेन्शन वाढले आहे. सलग चार महिने नियंत्रणात राहिल्यानंतर किरकोळ महागाईने रिझर्व्ह बँकेची २-६ टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. रिझर्व्ह बँकेने महागाई नियंत्रणाच्या अपेक्षेने सलग तीन वेळा रेपो दर स्थिर ठेवला आहे. आता महागाईचे आकडे मर्यादेच्या पुढे गेल्यानंतर रिझर्व्ह बँकेवर रेपो दरात वाढ करण्यासाठी दबाव येऊ शकतो.