
Tomato Price Hike | देशात मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईने इतिहास रचला असून सामान्य लोकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या भाज्या खरेदी करताना सुद्धा दमछाक होतं असून त्यासाठी प्रचंड पैसा खर्च करावा लागतोय. महिना १०-२० हजार रुपये पगार असणाऱ्यांना तर जगणं नकोसं झालं आहे. भारतातील बहुतांश बाजारपेठांमध्ये पूर्वी १० ते २० रुपये किलो दराने मिळणाऱ्या टोमॅटोचे दर आता १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. सध्या देशभरात टोमॅटोचा भाव १६० रुपयांवर गेला आहे. त्यामुळे सोनं-चांदीचा भाव आलेल्या टोमॅटोच्या शेतातून चोऱ्या होण्यास सुरुवात झाली आहे.
देशभरात टोमॅटोचे दर सातत्याने वाढत असून, त्यातून लवकरच दिलासा मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. आधीच पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडल्याने प्रवास खर्चात मोठी वाढ झाली आहे आणि त्यात देशातील अनेक भागांत पावसामुळे पुरवठा कमी झाल्याने गुरुवारी देशभरात टोमॅटोचे किरकोळ दर १६२ रुपये किलोपर्यंत पोहोचले. ग्राहक मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिलेल्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये टोमॅटो सर्वात महाग १६२ रुपये प्रति किलो दराने विकला गेला.
शेतातून २ लाख ७० हजारांचा टोमॅटो चोरट्यांनी लंपास केला
टोमॅटोचे दर वाढत असताना कर्नाटकातील बेलूर येथील एका शेतातून चोरट्यांनी २ लाख ७० हजार रुपयांचा टोमॅटो चोरून नेला. बेलूर येथील एका शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी मंगळवारी रात्री टोमॅटो चोरून नेला. आम्ही दोन एकरात टोमॅटोची पेरणी केली होती, पण आम्हाला काहीच मिळालं नाही. परवा कोणीतरी त्यांना चोरून नेले अशी माहिती शेतकऱ्याने दिली.
दुकानातून देखील टोमॅटो चोरीला
तेलंगणातील महबूबाबाद जिल्ह्यातील एका दुकानातून देखील वीस किलो टोमॅटो चोरीला गेल्याची घटना घडली आहे. भाजीविक्रेत्याने सांगितले की, त्यांच्या दुकानातील दोन बॉक्समध्ये ठेवलेले सुमारे ३५ किलो वजनाचे २० किलो टोमॅटो आणि इतर चार भाज्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या.
टोमॅटो कोणत्या दराने विकला जात आहे?
महानगरांमध्ये कोलकात्यात टोमॅटोचे किरकोळ दर सर्वाधिक १५२ रुपये प्रति किलो होते. त्यापाठोपाठ दिल्लीत १२० रुपये, चेन्नईत ११७ रुपये आणि मुंबईत १०८ रुपये प्रति किलो दर मिळाला. गुरुवारी अखिल भारतीय सरासरी किरकोळ टोमॅटोचा दर ९५.५८ रुपये प्रति किलो होता.