मुंबई : पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. मागील दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विम्याचे वाटप न केल्यास शिवसेना स्टाईलने रस्त्यावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, आज उद्धव ठाकरे हे स्वतः रस्त्यावर उतरले असून मुंबईमध्ये पीक विम्या संदर्भात मोर्चा काढण्यात आला आहे.

दरम्यान विरोधकांनी शिवसेनेच्या मोर्चाची खिल्ली उडविण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेनं काढलेल्या मोर्च्यावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील खिल्ली उडवली आहे. त्यांनी ‘शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष नाटक करत आहेत. राज्यात कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे,’ असा थेट आरोप शिवसेनेवर केला. तसेच पुढे बोलताना ‘जे सत्तेत राहून शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही ते रस्त्यावर उतरून नाटक करत आहेत अशी बोचरी टीका देखील केली आहे. त्यामुळे आता बनावट खत कंपन्यांवर कारवाई करण्याकरता केंद्र सरकारने नियंत्रण समिती स्थापन करावी,’ अशी मागणी देखील खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘ज्याचं अन्न खातोय त्याला आम्ही जागतोय, शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी शिवसेनेकडून मोर्चा काढण्यात आला आहे, विरोधकांनी आमच्यावर टीका करण्याआधी त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं हे पहाव. मोर्चाला नौटंकी बोलणारे नालायक आहेत अशा शब्दात विरोधकांवर टीका केली आहे.

सत्तेत राहून शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही ते रस्त्यावर उतरून नाटक करत आहेत: नवनीत राणा