मुंबई : राज ठाकरे यांच्या मनसेचं पहिलंच महाअधिवेशन २३ जानेवारीला म्हणजे आज बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी होत आहे. मागील अनेक दिवसांपासून या महाअधिवेशनाची तयारी सुरु होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक मुंबईत येत आहेत. मुंबईतील गोरेगाव इथल्या एग्जिबिशन सेंटर इथे सकाळी ९ वाजता या अधिवेशनाला सुरुवात झाली.
महाविकास आघाडीमुळे शिवसेनेला आक्रमक हिंदुत्वाची भूमिका अडचणीची ठरेल असा दावा केला जात आहे. याच गृहितकातून मनसेने हिंदुत्वाची कास धरत हिंदुत्ववादी शिवसैनिकांना साद घालण्यास सुरूवात केली आहे. मनसेने आपल्या झेंड्यावर शिवरायांची राजमुद्रा असलेला झेंड्याचं अनावरण झालं आहे आणि त्यानंतर उपस्थित महाराष्ट्र सैनिकांनी एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं.
राज ठाकरे यांची मनसे सेनेच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या स्थापनेवेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवातीला मराठीचा मुद्दा हात घेतला होता. परंतु, कालांतरानं सेनेनं हिंदुत्वचा मुद्दा हाती घेत राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री घेतली. राज ठाकरे यांनाही मराठीच्या मुद्द्या हाती घेत मनसेची स्थापना केली. आता सेने प्रमाणेच मनसेचं इंजिन हिंदुत्वाच्या दिशेनं धावणार का? हे लवकरचं स्पष्ट होईल.
विशेष म्हणजे आज बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी अमित ठाकरे यांना पक्षात मोठी जवाबदारी देण्याचं निश्चित झाल्याचं वृत्त आहे. आजच्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे राजकारण सुरु आहे त्यावरून राज्यात सामन्यांमध्ये संताप असल्याचं पाहायला मिळतं. एका बाजूला आपल्या आराध्य दैवताच्या नावाने राजकारण वेगळ्याच दिशेला जात असताना राज ठाकरे यांनी मनसेच्या स्थापनेपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वतःचे आणि पक्षाचे विचार मांडले आहेत. त्या हिंदुत्वात इतर धर्मियांप्रती कधीही द्वेष दिसला नाही हे सर्वश्रुत आहे. मात्र राज ठाकरे यांनी मांडलेलं तेच शिवरायांचं हिंदुत्व अमित ठाकरे पुढे घेऊन जाण्यास सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे आज राज ठाकरे यांनी शिवमुद्रा असलेल्या ध्वजाचं अनावरण करताच उपस्थित मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी देखील तो ध्वज हातात घेऊन जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं.
“छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ध्वजामध्ये अंतर्भूत करणं ही खूप मोठी जबाबदारी आहे ह्याची आम्हाला जाणीव आहे. मुघलांची आणि ब्रिटिशांची गुलामगिरीबद्दल बोललं जातं पण सव्वाशे वर्ष ह्या संपूर्ण भूप्रदेशावर मराठ्यांनी राज्य केलं हे आपण विसरतो.”- @anilshidore #मनसे_अधिवेशन
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) January 23, 2020
खरंतर मागील ७-८ वर्षांत मनसेला विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फारसा प्रभाव पाडता आला नाही. सतत पक्षाची पडझड होत गेली. राज्य पातळीवर पक्षबांधणीकडे दुर्लक्ष होत गेलं. ठोस कार्यक्रम नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची मरगळ आली. मात्र, आता महाअधिवेशनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
Web Title: Amit Raj Thackeray launching in MNS Maha Adhiveshan.
