मुंबई: गुरूवारी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. यावेळी त्यांनी भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला होता. ‘मुख्यमंत्रीपदाबाबतची चर्चा बंद दाराआड अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झाली होती. ती बंद दाराची खोली खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. त्यामुळे त्यांची ती खोली आम्हाला मंदिरापेक्षा कमी नाही. तिथे झालेली शहा-ठाकरे यांच्यातील चर्चा शहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितली नाही, त्यामुळे गोष्टी बिघडल्या’, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी थेट अमित शहा यांच्यावर केला होता. त्यामुळे आशिष शेलार यांनी आज संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.

केवळ सत्य सांगितल्यामुळे काही लोकांची अडचण झाली आहे. बाळासाहेबांच्या आदरापोटी नेते मातोश्रीवर जायचे, राजकीय स्वार्थासाठी असत्य पसरवणं हे अमान्य आहे. आता सत्तेच्या लालसेपोटी हॉटेलला चर्चेसाठी जावं लागत आहे. कुटुंबातील राज ठाकरेंनाही भेटायला मातोश्रीहून कोणी जात नव्हतं. आज मातोश्रीतून निघून माणिकराव ठाकरेंना भेटायला जात आहेत असा टोला आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. भाजपची आज संघटनात्मक तयारीची महत्वाची बैठक आहे. ९० हजार बूथवर संघटन मजबूत करणे या विषयावर आज देवेंद्र फडणवीस , चंद्रकांत पाटील हे आज आमदार, खासदारांना मार्गदर्शन करतील.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरी सरकार स्थापनेसाठी प्रमुख राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू आहेत. कोणत्याही परिस्थितीत मध्यावधी निवडणुका टाळण्याचा सर्वपक्षीयांचा प्रयत्न आहे. भाजपला वगळून सत्तास्थापन करण्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं एकमत झालं असून किमान समान कार्यक्रमाची आखणी सुरू झाली आहे.

वयासोबत परिपक्वता वाढावी असा टोला लगावत भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना वाढदिवसानिमित्त खोचक शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच ठाकरे आणि मोदींमध्ये विसंवाद निर्माण करण्यासाठी संजय राऊतच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. मंदिराची शपथ घेऊन असत्य पसरवणं मान्य नाही अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. शिवसेनेचा मोदींबदला आदर स्वाथी की नि:स्वार्थी असा सवाल यावेळी त्यांनी विचारला.

उद्धव ठाकरेंवर राग व्यक्त करण्यासाठी भाजपकडून ठाकरेंच्या कौटुंबिक नात्याचा वापर?