मुंबई : भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानभवनात भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे शिवसेनेत जाणार अशी चर्चा रंगली आहे. शिवसेनेकडूनही वरिष्ठ नेत्यांना एकनाथ खडसेंशी चर्चा करण्यास सांगितल्याचंही बोललं गेलं. मात्र, आता स्वतः एकनाथ खडसे यांनीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने खडसेंच्या पुढील राजकीय प्रवासाविषयी उत्सुकता वाढली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्रिपदी राहूनही फडणवीस यांना गेल्या ५ वर्षांत भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारता आले नाही, अशा शब्दात खडसे यांनी हल्ला चढवला. त्यामुळे खडसे अद्यापही नाराज असल्याचं बोललं जात आहे.

ते म्हणाले, मागील सरकार गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारू शकले नाही. हा प्रकल्प सुमारे ३०-४० कोटी रुपयांचा आहे. शरद पवार यांच्याकडे जी मागणी केली तिच मागणी आता उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यांनी याबाबत मदतीचे आश्वासन दिले आहे. तसेच जेव्हा या भागाचा दौरा असेल तेव्हा भेट देईन, असेही उद्धव ठाकरे म्हणाल्याचे खडसेंनी सांगितले.

तसेच पुढे एकनाथ खडसे यांनी सांगितलं की, “शरद पवार यांची मी जळगावमधील सिंचन प्रकल्पाविषयी चर्चा करण्यासाठी गेला होतो. उद्धव ठाकरेंशीही त्याबाबतच चर्चा केली. तसंच १२ तारखेला गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांच्याकडून स्वाभिमान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचं निमंत्रण देण्यासाठी आपण आलो होतो”.

 

BJP Senior Leader Eknath Khadse meet Chief Minister Uddhav Thackeray in Mumbai

खडसेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली; सोबत ओबीसी समाजाचे नेते देखील