मुंबई : आपण तेवढेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे आणि इतर सर्व देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा ही दिल्लीकर मतदारांनी फोडला आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील विधानसभा निवडणूक निकालावरुन भाजपला हाणले आहे. एका निवेदनात ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीने मिळविलेल्या जबरदस्त यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
केजरीवाल यांनी केलेल्या कामांच्या जोरावर पुन्हा सत्ता मिळवली हे मान्य केले पाहिजे. त्यांनी लोकांना गंडवले नाही व जे केले त्यावरच मते मागितली, असं सांगतानाच भारतीय जनता पक्ष हिंदू-मुसलमान, पाकिस्तान वगैरे बोंबलत बसले. ‘केजरीवाल हे एक नंबरचे आतंकवादी आहेत’ असे भारतीय जनता पक्षाने जाहीर केले. पण शेवटी विजय केजरीवाल यांच्या ‘आप’चा झाला. ‘आपमतलब्यां’चा पराभव झाला. केजरीवाल यांच्या झाडूने सगळ्यांना साफ केले, असा जोरदार टोला शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला लगावला आहे.
“दिल्लीच्या विधानसभेत कोणत्या प्रश्नांवर निवडणुका लढवाव्यात यावर भारतीय जनता पक्षात नेहमीप्रमाणे गोंधळ उडाला. नेहमीप्रमाणे येथेही हिंदू-मुसलमान, राष्ट्रवाद आणि देशद्रोह याच विषयांवर भारतीय जनता पक्षाने प्रचार केला व मते मागितली, पण दिल्लीतील सर्वच थरांतील मतदारांनी हे सर्व विषय ठोकरून लावले व केजरीवाल यांनी पाच वर्षांत जे काम केले त्यावरच मतदान केले. केजरीवाल यांनी ५ वर्षांत केलेल्या कामांवर मते मागितली. असे आपल्या निवडणुकीत सहसा घडत नाही. भावनिक आणि धार्मिक मुद्दय़ांवरच भर दिला जातो. भारतीय जनता पक्षाने नेहमीप्रमाणे दिल्लीत तेच केले. केजरीवाल यांनी केलेल्या कामांच्या जोरावर सत्ता पुन्हा मिळवली हे मान्य केले पाहिजे. त्यांनी लोकांना गंडवले नाही व जे केले त्यावरच मते मागितली.
Web Title: Chief Minister Uddhav Thackeray critisized PM Narendra Modi and Amit Shah over Delhi Election 2020 Result.
