मुंबई: ‘पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँके’च्या खातेदारांना दिलासा मिळावा यासाठी ‘रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया’च्या गव्हर्नरची भेट घेणारे शिवसेनेचे खासदार ‘सिटी को-ऑपरेटिव्ह बँके’बाबत उदासीन असल्याने या बँकेच्या खातेदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दीड वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही बँकेबाबत तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्र पाठवून निषेध करण्याची मोहीम खातेदारांनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी पीएमसी पाठोपाठ सिटी बँकेचा मुद्दाही निवडणुकीच्या तोंडावर तापणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळीच शिवसेनेचे अमरावतीचे खासदार अडचणीत आले होते. त्यानंतर ‘द सिटी को ऑप. बँकेच्या ठेवीदारांनी त्यांच्या विरुद्ध समाज समाज माध्यमांवर मोहीम सुरु केली होती. त्यात संबंधित ठेवीदार हातात बॅनर घेऊन त्यावर मतदाराला एक संदेश देत होते. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली होती.
सिटी को ऑप. बँकेच्या ग्राहकाला ६ महिन्यात केवळ एक हजार रुपयेच काढता येतील असे आरबीआयने सिटी को ऑप. बँकेवर निर्बंध घातले होते. आरबीआयच्या या निर्बंधामुळे सिटी को ऑप. बँकेचे ग्राहक मुंबईस्थित गिरगाव शाखेसमोर पैसे मिळावेत म्हणून रोज गोंधळ घालत बँकेच्या प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष व्यक्त करताना दिसले.
आरबीआयने १७ एप्रिल रोजी सिटी को ऑप. बँकेच्या प्रशासनाला प्रत्यक्ष पत्र पाठवून कोणत्याही ठेवी घेण्यास आणि कर्ज देण्यास मनाई केली होती. त्याबरोबरच आरबीआयने केलेल्या पत्रव्यवहारा प्रमाणे सिटी को ऑप. बँकेला कोणत्याही व्यवहारासाठी आधी रिझर्व बँकेची लेखी परवानगी आवश्यक असणार आहे असं स्पष्टं केलं आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांसमोर एकच खळबळ उडाली होती.
सिटी को ऑप. बँकेच्या एकूण दहा शाखा असून रिझर्व्ह बँकेकडून आधी म्हणजे डिसेंबरमध्ये एक नोटीस पाठविण्यात आली होती. त्यानंतरच १७ एप्रिलला आरबीआयकडून सिटी को ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व बचत आणि सेव्हिंग, चालू आणि करंट अकाऊंट आरबीआयने सील करून सिटी को ऑप. बँकेच्या व्यवहारावर निर्बंध घातले आणि हि बातमी पसरताच बँकेच्या ग्राहकांनी थेट बँकेच्या शाखेत धाव घेतली होती. ग्राहकांनी जेंव्हा आम्हाला आमचे पैसे परत हवे, अशी मागणी केली. त्यावर उत्तर देताना सिटी को ऑप. बँकेच्या प्रशासनाने स्पष्ट केलं की, रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधामुळे हे शक्य नसल्याचं आम्ही त्या बाबतीत काहीच करू शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली होती.
शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ हे सिटी को ऑप. बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आरबीआयच्या या निर्बंधांबाबत प्रतिक्रिया दिली होती की, आरबीआयकडून सिटी को ऑपरेटिव्ह निर्बंध येण्यापूर्वी आम्ही सिटी को ऑप. बँकेचे दुसऱ्या बँकेत विलिनीकरणाचे प्रयत्न सुरु केले होते आणि काम पूर्ण झालं असून, काही दिवसात हे विलिनीकरण पूर्ण होईल, त्यामुळे बँकेच्या ग्राहकाने चिंता करु नये. तसेच कोणाचाही पैसा बुडणार नाही. प्रत्येकाचे पैसे या बँकेत सुरक्षित असून, बँकेवर ७५ वर्ष जसा विश्वास ठेवला तसाच कायम असू द्या” असं आवाहन खासदार अडसूळ यांनी केलं होतं. परंतु ग्राहकाला ६ महिन्यात केवळ एक हजार रुपयेच काढता येतील असे आरबीआयने सिटी को ऑप. बँकेवर निर्बंध घातले आहेत, त्यामुळे ग्राहक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. मात्र आज देखील परिस्थिती जैसे थे असून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी या बँकेच्या ग्राहकांनी शिवसेनेवर संताप व्यक्त केला आहे.
