मुंबई: दिल्लीमधील जेएनयू विद्यापीठात झालेल्या हिंसाचारानंतर मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावर करण्यात आलेल्या आंदोलनात स्वतंत्र काश्मीरची मागणी करणारे पोस्टर झळकावण्यात आले. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे पोस्टर काश्मीरला काही बंधनांमधून मुक्त करा या मागणीसाठी होते असा दावा केला.

जेएनयू हल्ला विरोधी आंदोलन फुटीरतावाद्यांचे असल्याचे ‘फ्री काश्मीर’च्या पोस्टरमुळे सिद्ध होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. त्यावरून राजकारणही पेटू लागले आहे. फ्री काश्मीरचे पोस्टर झळकावणाऱ्या मेहक मिर्झा प्रभू तरुणीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काश्मीरमध्ये मागील १५० दिवसांपासून सर्व व्यवहार ठप्प आहे. आपण इथे राहून त्यांच्या अडचणी समजू शकत नाही. आपल्यासारखे स्वातंत्र्य काश्मीरमधील लोकांना मिळाले पाहिजे. मी काश्मीरमधील नसून मुंबईमधले असल्याचे मेहकने स्पष्ट केले. मेहकने झळकावलेले फ्री काश्मीरचे पोस्टर हे काश्मीरमधील फुटीरतावाद्यांची मागणीशी सुसंगत असल्याचा आरोप करण्यात येत होता. मात्र, मेहकने हे आरोप फेटाळून लावला आहे.

त्यानंतर राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं आहे. ‘देवेंद्रजी, ‘काश्मीर मुक्त करा’ याचा अर्थ काश्मीर भेदभावापासून, नेटवर्कवरील बंदीपासून आणि केंद्रीय अंकुशापासून मुक्त करा. तुमच्यासारखे जबाबदार नेते शब्दांचे भलते अर्थ लावून तिरस्कार निर्माण करत आहेत, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, यावर माझा विश्वासच बसत नाही. सत्ता गमावल्यामुळे हे होत आहे की तुम्ही आत्मनिग्रह हरवून बसला आहात?’ असा प्रतिप्रश्न जयंत पाटलांनी केला.

 

Web Title:  Girl who holding the free Kashmir Poster at gateway of India protest explained her views and clarification.

तो पोस्टर काश्मीरमधील निर्बंध, ठप्प व्यवहार व इंटरनेट बंदी संबंधित; तरुणीचं स्पष्टीकरण