मुंबई : मुंबईतील चेंबूरमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत (विशेष तपास पथक) व्हावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्या नेतृत्त्वात आज मुंबईतील चुनाभट्टी पोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला. यानंतर पोलिसांना दिलेल्या निवेदनात आरोपींना तात्काळ अटक करुन या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करावा, अशी मागणी करण्यात आली.

“माणुसकीच्या नात्याने आम्ही पीडित कुटंबाच्या मागे उभे आहोत. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी झाली पाहिजे. राज्यात अनेक ठिकाणी लहान मुलींवर बलात्काराच्या घटना घडत आहेत. गृहखात्याचं काम दुर्दैवी आहे, जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

तर नवाब मलिक यांनी या प्रकरणावरुन पोलिसांना जबाबदार ठरवलं आहे. “चेंबूरमधील बलात्कार प्रकरणात पोलिस यंत्रणेचं दुर्लक्ष झालं आहे. सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा. तसंच चौकशीसाठी एसआयटीची नेमणूक करावी आणि दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

चेंबुर लाल डोंगर ते चुनाभट्टी पोलिस ठाणे असा हा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो महिला, पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुंबईमध्ये राष्ट्रवादीने काढलेल्या सरकार विरोधातील मोर्चामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. चुनाभट्टी पोलिस ठाण्यावर भव्य मोर्चा आल्यावर पोलिसांनी तो अडवला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, मुंबई अध्यक्ष व राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आमदार विदया चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने पोलिसांची भेट घेऊन त्या नराधमांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तसं नाही झालं तर यापेक्षा मोठया पध्दतीचा व तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

तसेच या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी करतानाच जोपर्यंत त्या पिडीत कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिसांशी चर्चा करुन आल्यावर माध्यमांशी बोलताना दिला आहे. दरम्यान पिडीत मुलीच्या भावाला घेवून पोलिस महासंचालकांची भेट राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली.

मुंबईतील गँगरेप प्रकरणाचा एसआयटीमार्फत तपास करा, राष्ट्रवादीची मागणी