मुंबई : मुंबईतील चेंबूरमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत (विशेष तपास पथक) व्हावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षाचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्या नेतृत्त्वात आज मुंबईतील चुनाभट्टी पोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला. यानंतर पोलिसांना दिलेल्या निवेदनात आरोपींना तात्काळ अटक करुन या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत करावा, अशी मागणी करण्यात आली.
“माणुसकीच्या नात्याने आम्ही पीडित कुटंबाच्या मागे उभे आहोत. या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी झाली पाहिजे. राज्यात अनेक ठिकाणी लहान मुलींवर बलात्काराच्या घटना घडत आहेत. गृहखात्याचं काम दुर्दैवी आहे, जमत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
जालना( घनसावंगी )येथील १९ वर्षीय मुलीवर चेंबूर येथे चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेची एसआयटी चौकशी करावी या मागणीसाठी खा.@supriya_sule व @NCPspeaks मुंबई अध्यक्ष @nawabmalikncp यांच्या नेतृत्वाखाली, छगन मिठा पेट्रोल पंप ते चुनाभट्टी पोलिस ठाणे मोर्चा काढण्यात आला. pic.twitter.com/pSTsQCKL8W
— NCP Mumbai (@MumbaiNCP) August 30, 2019
तर नवाब मलिक यांनी या प्रकरणावरुन पोलिसांना जबाबदार ठरवलं आहे. “चेंबूरमधील बलात्कार प्रकरणात पोलिस यंत्रणेचं दुर्लक्ष झालं आहे. सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा. तसंच चौकशीसाठी एसआयटीची नेमणूक करावी आणि दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
जालनाजिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात राहणाऱ्या १९ वर्षीय मुलीवर झालेल्या क्रूर अत्याचारात दुर्दैवी मृत्यू झाला १ महिना उलटून देखील आरोपींवर शासनाने कुठलीही कारवाई केली नसून आरोपी अजूनही मोकाट आहेत घटनेच्या निषेधार्थ चेंबूर लालडोंगर-चुनाभट्टी पोलीस स्टेशनपर्यंत मोर्चा काढण्यात आला pic.twitter.com/4LgnZPqlgL
— Nawab Malik (@nawabmalikncp) August 30, 2019
चेंबुर लाल डोंगर ते चुनाभट्टी पोलिस ठाणे असा हा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो महिला, पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुंबईमध्ये राष्ट्रवादीने काढलेल्या सरकार विरोधातील मोर्चामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. चुनाभट्टी पोलिस ठाण्यावर भव्य मोर्चा आल्यावर पोलिसांनी तो अडवला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, मुंबई अध्यक्ष व राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आमदार विदया चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने पोलिसांची भेट घेऊन त्या नराधमांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तसं नाही झालं तर यापेक्षा मोठया पध्दतीचा व तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
या घटनांचे कोणीही समर्थन करणार नाही.कायद्याचा धाक या राज्यात उरला की नाही याची शंका येतेय.वरील दोन्ही प्रकरणी आरोपींना कडक शासन व्हावे या मागणीसाठी @MumbaiNCP च्या वतीने मोर्चा काढून आमदार विद्याताई चव्हाण,माजी आमदार मिलिंद कांबळे यांच्यासह पोलीस महासंचालकांना निवेदन देण्यात आले. pic.twitter.com/qQR91Z4die
— Supriya Sule (@supriya_sule) August 30, 2019
तसेच या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी करतानाच जोपर्यंत त्या पिडीत कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिसांशी चर्चा करुन आल्यावर माध्यमांशी बोलताना दिला आहे. दरम्यान पिडीत मुलीच्या भावाला घेवून पोलिस महासंचालकांची भेट राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने घेतली.
