मुंबई: महाराष्ट्र विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर झाले. त्यात भाजप हा १०५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला तर शिवसेना ५६ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. हे दोन्ही पक्ष महायुतीने निवडणुका लढले होते. मात्र, निकालानंतर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरून या दोन्ही पक्षांत संघर्ष सुरू झाला. शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम राहिल्याने व भाजपने ही मागणी सपशेल फेटाळून लावल्याने या सत्तासंघर्षाने कळस गाठला.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. याचबरोबर राज्यपालांनी फडणवीस यांना ११ नोव्हेंबरपर्यंत (सोमवार) बहुमत सिद्ध करण्यासही सांगितलं आहे. या अगोदर फडणवीस यांनी राज्यात भारतीय जनता पक्षाच्याच नेतृत्वात सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता.

भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष असल्याने त्यांना पहिली संधी मिळाली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. भाजपाने यापूर्वी स्पष्ट बहुमत नसतानाही अनेक राज्यांमध्ये सत्तास्थापनेसाठी दावा केलेला होता, असा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला. तसेच गेल्या १५ दिवसांत भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

त्यामुळे राज्यात सरकार स्थापनेवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे. राज्यपालांच्या पुढाकारानेच आता राज्याला नवे सरकार मिळू शकते. राज्यपालांनी भारतीय जनता पक्षाला संधी दिली आहे, त्यांनी याला लाभ घेतला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच भारतीय जनता पक्षाने बहुमत सिद्ध करून दाखवावं, असे थेट आव्हानही राऊत यांनी दिले आहे.

भारतीय जनता पक्षाचा भ्रमाचा भोपळा फुटला असल्याचा घणाघातही संजय राऊत यांनी केला. कुणाचेही आमदार फुटणार नसल्याचं ते म्हणाले. शिवसेनेचे आमदार सध्या मुंबईतील मालाडमधील हॉटेल रिट्रीटमध्ये आहेत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मध्यरात्री सर्व आमदारांशी चर्चा केली आणि हॉटेलमध्येच मुक्कामही केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही आमदारांना भेटण्याची शक्यता आहे.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी रात्री मालाड येथील रिट्रीट हॉटेलला अचानक भेट देत आमदारांसोबत चर्चा केली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आमदारांसोबतच हॉटेलमध्ये मुक्काम केल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना आमदारांची आज द रिट्रिट हॉटेलवर महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. आदित्य ठाकरे हे दुपारी साडेबारा वाजता ही बैठक घेणार असून या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

भारतीय जनता पक्षाला सत्तास्थापनेचं निमंत्रण मिळाल्यानंतर शिवसेनेनेही हालचाली सुरु केल्या आहेत. शिवसेनेच्या आमदारांशी कुणीही संपर्क करु नये यासाठी सर्व काळजी घेतली जात आहे. आमदारांची सर्व जबाबदारी खासदार अनिल देसाई, गजानन किर्तीकर, मिलिंद नार्वेकर, रामदास कदम या वरिष्ठ नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे रिट्रीट हॉटेलमध्ये सेनेच्या सर्व आमदारांसोबत बैठक घेणार