मुंबई: ‘भारतीय जनता पक्ष-शिवसेनेमध्ये तिसऱ्या कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम असून मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव घेऊन येणार असाल तर बोला,’ अशा शब्दांत शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा भूमिका मांडली. त्यामुळं आता सत्तास्थापनेचा चेंडू भारतीय जनता पक्षाच्या कोर्टात असून भारतीय जनता पक्ष काय निर्णय घेते हे पाहावं लागणार आहे.

महाराष्ट्रात कर्नाटकप्रमाणे घोडेबाजार होईल का? असं जर माध्यमांना वाटत असेल तर महाराष्ट्रात पारदर्शकता शिल्लक नाही असंच म्हणावं लागेल असंही राऊत यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र कधीही कोणाही समोर झुकणार नाही. शरद पवार जसे कोणाही समोर झुकले नाहीत तसंच उद्धव ठाकरेही कोणाही समोर झुकणार नाहीत असंही संजय राऊत म्हटले आहेत.

काळजीवाहू बनून कोणीही सूत्रं हलवू नयेत असा टोला शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी लगावला. उद्धव ठाकरे निर्णयावर ठाम आहेत. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी सरकार बनवावं असंही राऊत आज पत्रकार परिषदेत म्हणाले. भारतीय जनता पक्ष-सेनेच्या चर्चेत मध्यस्थांची गरज नाही. शरद पवार दिल्लीसमोर झुकले नाहीत, उद्धव ठाकरेही झुकणार नाहीत असंही संजय राऊत म्हणाले.

याचसोबत अयोध्या प्रकरणात शिवसेनेचं योगदान कोणीही नाकारु शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय सर्वांना मानावा लागेल. महाराष्ट्रात काळजीवाहू सरकार राहू नये, कायमस्वरुपी स्थिर सरकार यावं त्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांना वाटत असेल तर त्यादृष्टीने हालचाली कराव्या लागतील. ही वेळ ज्यांनी आणली आहे त्यांना महाराष्ट्राला उत्तर द्यावं लागेल. अमित शहांसमोर या सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या, म्हणून ते हस्तक्षेप करत नाही असंही संजय राऊत यांनी सांगितले आहे.

काळजीवाहू बनून कोणीही सूत्रं हलवू नयेत; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला