मुंबई : मुंबईकरांसाठी एक क्लेशदायक बातमी येण्याची शक्यता आहे. कारण लवकरच सामान्य माणसाच्या दैनंदिन वापरातील रिक्षा आणि टॅक्सीच्या भांडयात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. विशेष म्हणजे बेस्टकडून भाडेकपातीचा निर्णय घेतला जात असतानाच रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ मात्र होण्याची शक्यता आहे. सदर विषयाला अनुसरून शुक्रवारी परिवहन विभाग, टॅक्सी संघटना आणि मुंबई ग्राहक पंचायतीची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यात टॅक्सी संघटनांनी पंचवीस रुपये भाडेवाढीची मागणी केली. येत्या मंगळवारी भाडेवाढीवर पुन्हा चर्चा होणार आहे.
मागील ३ वर्षांत टॅक्सीच्या भाडय़ात वाढ झालेली नाही. मात्र सीएनजीच्या दरात ऑगस्ट २०१७ पासून आतापर्यंत तब्बल ५ वेळा झालेली वाढ पाहता मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने ३० रुपये भाडेवाढीची मागणी परिवहन विभागाकडे केली आहे. टॅक्सी संघटनांच्या मागणीचा विचार करता शुक्रवारी मंत्रालयात परिवहन सचिव आशीष सिंह, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने सरचिटणीस ए. एल.
क्वाड्रोस, मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष शिरीष देशपांडे यांची बैठक झाली. यात भाडे निश्चितीसाठी २०१७ साली नेमलेल्या खटुआ समितीच्या शिफारसींवर चर्चा झाली. यात टॅक्सी संघटनेने ३० रुपये भाडेवाढीच्या ऐवजी २५ रुपये तरी भाडेवाढ द्या, अशी मागणी केली. भाडेवाढ केल्यास खटुआ समितीतील अन्य प्रवास सवलती मात्र त्वरित लागू करू नका, असेही सांगितले. यावर ग्राहक पंचायतीने आक्षेप घेतला.
