मुंबई: राज्याच्या राजकारणात शनिवारी धक्कादायक घडामोडी घडल्या आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे या शपथविधीबाबत कमालीची गुप्तता पाळली गेली होती. म्हणजे प्रसार माध्यमांना देखील याची कोणतीही चुणूक लागू दिली नव्हती. विशेष म्हणजे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांसाठी देखील हा मोठा धक्का होता.

देशातील एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याने लपून शपथविधी घेण्याची ही पहिलीच वेळ असावी. मात्र यामध्ये सामान्य मतदारापासून राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एवढंच नाही तर कायदा सुव्यस्वस्थेला जवाबदार असणाऱ्या पोलीस यंत्रणेच्या डोळयात देखील धूळफेक केली गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यासाठी पहाटे मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममार्फत फडणवीस सिध्दीविनायक मंदिरात दर्शनासाठी येणार असल्याचा मेसेज सोडून बंदोबस्त वाढविण्यात आला.

कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याचं एक उदाहरण म्हणजे मुंबई पोलिसांना बंदोबस्तासाठी उभे करून त्याच गाडयांचा ताफा थेट राजभवनाच्या दिशेने वळविण्यात आला. तत्पूर्वी म्हणजे राष्ट्रपती राजवट लागण्याच्या दोन दिवस आधीच मुंबईतील मरोळ पोलीस कॉलनी आणि इतर मोठ्या जागा उपलब्ध असलेल्या पोलीस वस्त्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर जाळ्या लावून बेस्ट प्रशासनाच्या बसेस तयार ठेवण्यात आल्या होत्या आणि त्याची मोठी चर्चा या कॉलनीमधील रहिवाशांमध्ये रंगली होती, मात्र कोणताही उत्सव, आपत्कालीन परिस्थिती किंवा गंभीर घटना शहरात घडली नव्हती. मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेस्ट प्रशासनाच्या बसेस पोलीस वसाहतीत सज्ज का याची कल्पना पोलिसांना देखील नव्हती. तसेच सज्ज ठेवण्यात आलेल्या रिझर्व्ह पोलिसांना का सज्ज ठेवण्यात आलं आहे हे देखील माहित नव्हतं असं उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी सूत्रांना दिलेल्या माहिती सांगितलं. नेमकी त्याच्या २-३ दिवसांनी अचानक राष्ट्रपती राजवट लागली तेव्हा पोलिसांना देखील भानगड समजली असं वृत्त आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष स्वतःच्या गुप्त कृत्यातून हेच सिद्ध करत आहे की त्यांची बाजू किती चुकीची आहे, ज्यामध्ये पोलीस यंत्रणादेखील गाफील ठेवली जातं आहे.

पोलीस कंट्रोल रूमची सुद्धा दिशाभूल? सिद्धिविनायक दर्शनाच्या नावाने बंदोबस्त अन गाड्या राजभवनाकडे