मुंबई: काँग्रेस-राष्ट्रवादीची समन्वय समितीची आजची बैठक अचानक रद्द झाल्याचं खुद्द अजित पवार यांनी सांगितलं. मात्र, त्यानंतर झालेल्या गदारोळानंतर तात्काळ ही बैठक पुन्हा सुरु झाली आहे. किमान समान कार्यक्रम ठरवून शिवसेनेशी युती करण्यासाठी दोन्ही पक्षांनी ही पहिलीच बैठक आयोजित केली होती. आता नव्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची (NCP and Congress Leaders Meet) ही बैठक सुरु असल्याचे फोटो समोर आले आहेत. त्यात बारामतीला जात असल्याचे सांगणारे अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) देखील सहभागी झाल्याचे दिसत आहेत.

दरम्यान, आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी प्रसार माध्यमांना अजित पवार यांच्याबाबतीत स्पष्टीकरण देताना म्हटलं की, बैठकीतल्या काही गोष्टी गुपित असल्याचं आणि त्या सर्व गोष्टी स्पष्ट होईपर्यंत गुपित ठेवण्याचं ठरल्याने अजित पवार यांनी निघताना तशी प्रतिक्रया दिल्याचं म्हटलं. कारण, याच विषयावरून प्रसार माध्यमांमध्ये मोठी चर्चा रंगली होती.

किमान समान कार्यक्रम ठरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत पहिलीच भेट होणार होती. मात्र, तीच रद्द झाल्याचं बोललं गेल्याने चर्चेला उधाण आले होते. बैठक ऐनवेळी रद्द करण्यामागील नेमकं कारणही सांगण्यात न आल्याने गोंधळात आणखी भर पडली. मात्र, या गोंधळानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक सुरु असल्याचे फोटो समोर आले. त्यानुसार ही बैठक होत असून दोन्ही पक्षाच्या समन्वय समितीतील नेते चर्चा करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी रात्री पार पडली. विशेष म्हणजे बैठकीच्या ठिकाणाचा थांगपत्ता लागू नये यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पत्रकारांना चांगलाच चकवा दिल्याचे पहायला मिळाले. या दोन्ही पक्षांची उद्या गुरुवारीही बैठक होणार आहे.

या बैठकीत काय ठरले हे समजले नसले तरी या बैठकीला अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नवाब मलिक यांच्यासह दोन्ही पक्षांचे इतरही नेते उपस्थित होते. गुरुवारीही आमची बैठक होणार आहे, असे थोरात यांनी सांगितले आहे.

सकाळी राष्ट्रवादीची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आणि संध्याकाळी ‘सिल्व्हर ओक’ (Silver Oak) येथे तर सायंकाळी काँग्रेसची दादरच्या टिळक भवनात बैठक झाली. आज सायंकाळी साडेसात वाजता बैठक घेऊया, असे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ठरवले होते. पत्रकारांनाही ते समजले होते. त्यामुळे टीव्ही पत्रकारांनी सिल्व्हर ओक आणि टिळक भवनात ठिय्याच मांडला होता.

काँग्रेस-राष्ट्रवादीची समन्वय बैठक पत्रकारांना चकवा देत पार पडली