मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्यात असून, राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील अनेक नेते दिल्लीत ठाण मांडून आहे. तर याच मुद्यावरून राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यात चाललं नाही ‘ते’ दिल्लीत काय चालणार, असा खोचक टोला राष्ट्रवादीने भाजपला लगावला आहे.

दरम्यान, केजरीवाल यांनी विकासाच्या मुद्यांवर भारतीय जनता पक्षाला घाम फोडल्याचे पाहायला मिळत आहे. झारखंड मधील पराभवानंतर भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करून तगडी फौज केजरीवालांविरोधात उभी केली आहे. त्यासाठी देशभरातील तब्बल २००, खासदार, ७० केंद्रीय मंत्री आणि ११ विद्यमान आणि माजी मुख्यमंत्री दिल्लीमध्ये प्रचारासाठी दिल्लीत तळ ठोकून आहेत. त्यात महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख नेत्यांना दिल्लीतील प्रचारात उतरविण्यात आलं होतं. मात्र दिल्लीतील राजकारणावरून राष्ट्रवादीने भाजपच्या नेत्यांना अनुसरून खोचक पोस्ट केली आहे.

त्यात राष्ट्र्वादीने म्हटलं आहे की, “दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी आता जेमतेम एक दिवस उरला आहे. दिल्लीच्या जनतेने भाजपाला साफ नाकारल्याचेच अनेक सर्वेक्षणांमधून समोर आलेय. त्यामुळे भाजपाने दिल्ली निवडणुकीचा प्रचंड धसका घेतला असून दिल्ली आता आपल्या हाती लागणार नाही असेच जणू त्यांना वाटत आहे. यामुळे भाजपाने आपल्या सभांची संख्या दुप्पट केली आहे, तर महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांच्यासारख्या नेत्यांची फौज दिल्लीला बोलवली आहे. याशिवाय भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा आणि अमित शहा स्वतः या सभांना संबोधित करणार आहेत. भाजपा दिल्ली जिंकण्यासाठी आता महाराष्ट्राचं प्रचार कार्ड वापरत आहे. पण ज्यांना महाराष्ट्राने नाकारलं ते दिल्ली कशी जिंकून देणार हा प्रश्नच आहे” अशी राष्ट्रवादीने भाजपच्या राज्यातील नेत्यांची खिल्ली उडवली आहे.

 

Web Title:  NCP Party criticizes BJP over Delhi Assembly Election 2020.

दिल्ली: जे कार्ड राज्यात चाललं नाही ते दिल्लीत काय चालणार? राष्ट्रवादीकडून खिल्ली