मुंबई: ५ टक्के काम झालंय अजून ७५ टक्के करायचे आहे. जर कंपनीने मनापासून ठरवलं आणि कोणत्या परवानग्या शिल्लक राहील्या नाहीत तर २ वर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम पूर्ण होईल. अस मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केल आहे. इंदू मिल येथील जागेची पाहणी शरद पवार यांनी केली त्यानंतर ते बोलत होते.

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शापूजी पालनजी कंपनीने देखील हे आव्हान म्हणून स्वीकारायला हवे. हे स्मारक मुंबई महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षण असेल. भारत आणि भारताबाहेर जिथे बौद्ध समाज आहे. त्या सर्वांमध्ये या स्मारकाबद्दल आकर्षण राहील. या देशातील प्रत्येक नागरिक महामानवाच्या दर्शनासाठी इथे आल्याशिवाय राहणार नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यापेक्षा तो निधी मुंबईतल्या वाडिया रुग्णालयाला द्या, अशी मागणी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. त्याबद्दल शरद पवारांना प्रसार माध्यमांकडून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले की, वाडियासाठी असलेला निधी रुग्णालय प्रशासनाला मिळेल. पण स्मारकं व्हायला हवीत, असं पवार यांनी म्हटलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी स्मारकाला विरोध दर्शवला आहे. स्मारकाला होणाऱ्या विरोधावर पवारांनी कोणाचंही नाव न घेता भाष्य केलं. लोकशाही असल्याने प्रत्येकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. आपण सगळ्यांचं ऐकायचं. त्यातून योग्य ते घ्यायचं आणि बाकीचं सोडून घ्यायचं, असं शरद पवार म्हणाले.

 

Web Title:  NCP President Sharad Pawar visited Dr Babasaheb Ambedkar Memorial Indu Mill.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रस्तावित स्मारकाच्या कामाची पवारांकडून पाहणी