मुंबई: राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढता ताण लक्षात घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामधून शरद पवारांनी बंदोबस्तावेळी होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची व्यथा मांडली आहे. या पत्रात शरद पवार म्हणाले की, जाहीर सभा वा दौऱ्यांच्या ठिकाणी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या आगमन व प्रस्थानावेळी पोलीस प्रशासनावर विशेष ताण असतो. इतर वेळी पोलीस कर्मचाऱ्यांना तासनतास तिष्ठत उभे राहावे लागते. केवळ पोलीस कर्मचारीच नाही तर अशा सभाप्रसंगी पोलीस अधीक्षक व वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील तिष्ठत उभे राहतात असं ते म्हणाले.

विशेषत: महिला पोलीस कर्मचाऱ्यांना निष्कारण त्रास सहन करावा लागतो असे मला वाटते. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील तिष्ठत राहणे मला उचित वाटत नाही. त्यामुळे सभा शांततेत शुरू असताना महिला पोलीस कर्मचारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार बसण्यासाठी खुर्ची अथवा आसन उपलब्ध करून देण्याविषयक संयोजकांना मार्गदर्शक सूचना निर्गमित व्हाव्यात अशी मागणी शरद पवारांनी पत्रात केली आहे.

वास्तविक पवार आज संयोजकांना ज्या मार्गदर्शक सूचना निर्गमित व्हाव्यात अशी मागणी करत आहेत, त्याच तत्वांचं सामाजिक भान जपत मनसेचे कार्यकर्ते नियमित पालन करताना दिसले आहेत जे सभांमधून सहज नजरेस पडते. त्यासाठी महाराष्ट्र सैनिकांनी संयोजक म्हणून कोणत्याही सरकारी मार्गदर्शक सूचनांची वाट पाहिली नाही हे वास्तव आहे. प्रत्येक सभेत सभेसाठी आणल्या गेलेल्या खुर्च्या मोठ्या मनाने बंदोबस्तावरील पोलिसांना देखील देण्यात येतात. मात्र प्रसार माध्यमांमध्ये वेगळी बातमी पसरू नये म्हणून अनेक पोलीस ते टाळतात. इतकंच नव्हे तर सभेचं आयोजन करताना मनसेचे कार्यकर्ते बंदोबस्तावरील पोलिसांच्या अल्पउपहाराची देखील सोय करतात आणि सभेचं मैदान स्वच्छ राहील याची काळजी देखील घेतात.

हे केवळ एक-दोन नव्हे तर बहुतेक सर्वच सभांमध्ये नैसर्गिकपणे घडत जाणारा मनसेचा नित्यनियम असल्याचं पाहायला मिळतं ज्याची कधी वाच्यता होतं नाही. केवळ इतकंच नाही तर खुलेआम पणे राज ठाकरे अनेक सभांमध्ये पोलिसांच्या समस्या देखील मांडत असतात हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये देखील राज ठाकरेंबद्दल एक छुपी आस्था आहे. दोन दिवसांपूर्वी पवारांनी मुंबईतील महामोर्च्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांना लक्ष करताना, राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं म्हटलं होतं. मात्र आज महाराष्ट्र सैनिक जे स्वतःहून प्रत्येक सभेत पोलिसांसाठी करतात, त्यापैकी एक म्हणजे बंदोबस्तावरील ठिकाणी बसण्याच्या खुर्चीचा विषय का होईना पण त्यांनी ‘गांभीर्याने’ घेतल्याचं दिसत आहे. असे सामाजिक भान जपणारे कार्यकर्ते घडवणाऱ्या नेत्याला पवार ‘गांभीर्याने’ घेऊ नका असं म्हणतात त्याला खरंच ‘अनाकलनीय’च म्हणावं लागेल. कारण विधानसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा ईव्हीएम’चा विषय चिघळला होता तेव्हा संपूर्ण देशात राष्ट्रवादी-काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना देशात कोणीही ‘गांभीर्याने’ घेत नसल्यामुळे, ईव्हीएम संबंधित सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत राज ठाकरेंना मध्यभागी बसवून माईक हातात दिल्यानंतर ‘काँग्रेस-राष्ट्रवादीच्या’ नेत्यांचे ‘गंभीर’ चेहरे सर्वानी पाहिलं होते.

 

Web Title: NCP President Sharad Pawar wrote a letter to State Home Minister state important demand regarding police.

मनसेच्या सभांवेळी पोलिसांसंबंधित दिसणाऱ्या गोष्टी पवारांनी ‘गांभीर्याने’ घेतल्या; खुर्ची पासून सुरुवात