मुंबई: सत्तास्थापनेबाबत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. भारतीय जनता पक्षाने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला निमंत्रित केलं आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवरून चर्चा झाली होती. यावेळी शरद पवारांनी उद्धव यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच त्यानंतर आता उद्धव ठाकरे शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाण्यासाठी रवाना झाले आहेत.

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा वाढला असून भारतीय जनता पक्षाने सत्तास्थापन करण्यात असमर्थता दाखविली आहे. त्यामुळे राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला निमंत्रण दिलं आहे. मुख्यमंत्रिपदावर ठाम असणारी शिवसेना एनडीएतून बाहेर पडत नाही तोवर शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार होऊ शकत नाही, असं आघाडीने सांगितले. त्यामुळे शिवसेनेचे केंद्रातील एकमेव अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. अरविंद सावंत थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत.

सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण मिळाल्यानंतर शिवसेनेनं बहुमताच्या आकड्यांची जुळवाजुळव रविवारी रात्रीपासून सुरू केली होती. त्यानंतर सकाळपासून ‘मातोश्री’वर चर्चा सुरू होती. तसेच राज्यपालांना द्यायच्या पत्रावर शिवसेना आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, बैठकीनंतर उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरेंसह एनसीपी’चे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी रवाना झाले असले तरी पवारांना भेटल्यानंतर सत्तेचं चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार आहे.

उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी आज दुपारी शिवसेना आमदारांची मातोश्री येथे बैठक घेतली. या बैठकीनंतर उद्धव आणि आदित्य शरद पवारांच्या भेटीला रवाना झाले आहेत. या दोघांमध्ये कोठे बैठक होणार हे अद्याप निश्चित नाही. पण, या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत चर्चा होणार असून, त्यानंतर राजकीय परिस्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना, एनसीपी’ आणि काँग्रेस असे महाशिवआघाडीचे सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

या तिन्ही पक्षांचे जाहीरनामे वेगवेगळे असले तरी, यांचा अभ्यास केला जात आहे. त्यानंतर राज्यासाठी एकत्र कार्यक्रम राबविला जाणार आहे. आता ४ वाजता काँग्रेस आणि एनसीपी’कडून होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यापूर्वी शिवसेनेने आपल्या आमदारांच्या सह्या घेतल्या आहेत. तर, काँग्रेसही शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी सकारात्मक आहे.

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांदरम्यान निर्णायक चर्चा सुरु