मुंबई: पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. २३ सप्टेंबर पासून हे निर्बंध लागू झाले आहेत. बँकेची सद्यस्थिती पाहून नागरिकांच्या हितासाठी बँकेवर निर्बंध आणल्याचं रिझर्व्ह बँकेने आपल्या आदेशात नमूद केलं आहे.

बँकिंग नियमन कायदा ’३५ अ’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. पीएमसी बँकेवर नवी कर्ज देणे, ठेवी स्वीकारण्यासह अनेक गोष्टींवर निर्बंध असतील. तसेच निर्बंधाच्या काळात बँकेच्या ठेवीदारांना आपल्या सर्व प्रकारच्या खात्यांमधून केवळ एक हजार रुपयेच काढता येतील. रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देऊ नये, जुन्या कर्जांचे नूतनीकरण करू नये, बँकेने कोणतीही गुंतवणूक करू नये, तसेच नव्या ठेवी स्वीकारू नयेत, किंवा बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करू नयेत, अशाप्रकारचे निर्बंध बँकेवर असतील असं आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, आरबीआय ने पंजाब अँड महाराष्ट्र बँकेचे सर्व व्यवहार सहा महिन्यांसाठी थांबवले असल्याचे सांगण्यात येत आहे. काल सकाळी बँकेमार्फत ग्राहकांना याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळेचिंतीत झालेले ग्राहक बँकेत मोठ्या संख्येने जमले असून, त्यांचे कर्मचाऱ्यांसोबत वाद सुरू आहेत. अनेकांना रडू देखील कोसळल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले. रिझर्व्ह बँकेने यासंदर्भातील आदेश प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार पीएमसी बँकेला रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय नवे कर्ज देता येणार नाही. तसेच ठेवी स्वीकारता येणार नाही. तसेच पुढच्या काळात बँकेला गुंतवणूक करता येणार नाही. त्याबरोबरच बँकेच्या ग्राहकांना आपल्या खात्यामधून केवळ एक हजार रुपये एवढीच रक्कम काढता येईल.

 

अंधेरी पूर्व पूणमनगर येथील शाखेत प्रचंड गर्दी केलेल्या ग्राहकांनी तर थेट स्थानिक नेत्याची नावं घेत त्रागा व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले, तसेच स्थानिक आमदार आणि मंत्र्यांची नावं घेत बँकेच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. संपूर्ण प्रकार हा अगदी नोटबंदी झाली त्यानंतर जसे श्रीमंत बँकांमध्ये दिसलेच नाही आणि त्यांना सर्वकाही घरपोच किंवा पाठच्या दराने मिळालं तसंच काहीसा प्रकार पीएमसी बँकेच्या बाबतीत घडल्याचे अनेक ग्राहक संताप व्यक्त करत सांगत होते आणि त्यातील अनेकजण बँकेच्या शाखेत रडत संताप व्यक्त करत होते.

सदर सूचना बँकेत जरी काल लावण्यात आली असली तरी बँकेवर संबंधित कारवाई होणार याची वरिष्ठांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळे हितसंबंध असलेल्या मोठ्या कंपनी ग्राहकांना सदर कारवाई होण्याआधीच आणि बँकेने नोटीस लावण्याआधीच पूर्ण कल्पना देत त्यांचे बँक अकाउंट खाली करण्यास म्हणजे पैसे काढून घेण्यास सांगितले गेल्याचा आरोप एंक ग्राहकांनी केला ज्यांना तिथली स्थानिक माहिती होती.

पीएमसी बँकेच्या मुंबई पूनमनगर येथील शाखेत स्थानिक ग्राहकांनी थेट शिवसेनेचे मंत्री रवींद्र वायकर यांच्या मतदारसंघात येतो आणि ते का उपस्थित नाहीत असे प्रश्न विचारले आणि काहींनी थेट मातोश्री क्लबच आणि त्यांच्या उपकंपन्यांची नावं घेत अनेक प्रश्न उपस्थित केल्याचे पाहायला मिळाले. शाखेच्या बाहेर गर्दी केलेल्या सामान्य ग्राहकांमध्ये देखील हीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. त्यानुसार अनेक मोठ्या ग्राहकांनी त्यांचे बँक अकाउंट १५ दिवस आधीच माहिती मिळताच खाली केल्याची चर्चा रंगली होती. स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ज्यांचे या शाखेत बँक अकाउंट आहेत त्यांनी हा विषय चर्चेचा केला आणि गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळले. त्यांचा थेट रोख हा मंत्रिपदावर असलेल्या रवींद्र वायकर यांच्यावर होता. त्यांचा मतदारसंघ असूनही काल ते फिरकलेच नाहीत, मात्र त्यांच्या पत्नी लोकांना भेटण्यासाठी आल्या, पण सामान्य ग्राहकाचा आक्रोश पाहून २-४ मिनिटातच त्या निघून गेल्याचे दिसले. शाखे बाहेर सर्वत्र गोंधळ माजलेला असताना स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आणि ग्राहकांनी केलेल्या आरोपानुसार मातोश्री क्लब संबंधित सर्व कंपन्यांचे करंट अकाउंट याच शाखेत आहेत, मात्र त्यांचे सर्व व्यवहार ठप्प होणार असून देखील त्यांना काहीच आक्षेप नाही यातच आमचे आरोप खरे आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. आम्ही हेच प्रश्न बँकेच्या शाखेतील कर्मचाऱ्यांना विचारले मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली असं सांगत संताप व्यक्त केला.

स्वतःचा मतदासंघ असून आणि मातोश्री क्लब संबंधित सर्व कंपन्यांचे व्यवहार या शाखेशी संबंधित असून देखील मंत्री असलेले रवींद्र वायकर या बँकेकडे काल साधे फिरकले देखील नाहीत आणि त्यामागील गौडबंगाल नक्की काय आहे, असा प्रश्न अनेक काँग्रेसशी संबंधित ग्राहकांनी उपस्थित केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, सदर वातावरणाचा त्यांना स्थानिकांमार्फत अंदाज येताच आणि मतदारसंघातील लोकांनी प्रश्न उपस्थित करू नये म्हणून आज सकाळी १०:५७ वाजता पाहिलं ट्विट केलं. त्यात त्यांनी म्हटलं, ‘मी पीएमसी बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर जॉय थॉमस यांच्याशी काल संध्याकाळी संपर्क केला होता, त्यांनी खात्री दिली की बँकेचे व्यवहार दोन महिन्यात सुरळीत होतील आणि त्यासाठी ६ महिने थांबावं लागणार नाही.

त्यानंतर त्यांनी पुन्हा १०:५९ वाजता पुन्हा दुसरं ट्विट केलं, ‘मी बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर जॉय थॉमस यांना रिझर्व्ह बँकेसोबत संपूर्ण सहकार्य करण्यास सांगितलं असून बँकेचे सर्व व्यवहार एका आठवड्यात सुरळीत होतील.

त्यानंतर त्यांनी पुन्हा ११:०२ वाजता पुन्हा तिसरं ट्विट केलं, ‘आम्ही रिझर्व्ह बँकेला सदर विषय लवकर निकालात काढून आठवड्याभरात किंवा लवकरात लवकर बँकेचे व्यवहार सामान्यपणे होतील आणि त्यामुळे सामान्य माणूस भरडला जाणार नाही, असं म्हटलं आहे.

याच बँकेने एचडीआयएल या बांधकाम संबंधित कंपनीला नियमांची पायमल्ली करत अफाट कर्ज दिलं आणि त्याच एचडीआयएल’ने मागील महिन्यात बँक्रप्ट अर्थात कंपनी दिवाळखोर झाल्याचे कळविले आहे. त्यामुळे या बँकेतील राजकारण्यांचे हितसंबंध आणि नियम डावलून दिलेली वारेमाप कर्जच सध्याच्या परिस्थितीला कारणीभूत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

सामान्य अंधारात मात्र धनाढ्यांना पूर्व कल्पना; कंपनी अकाउंट आधीच खाली; मातोश्री क्लबचं नाव चर्चेत