मुंबई : नाणार प्रकल्प विदर्भात घेऊन जाण्याच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. आधी समुद्र विदर्भात आणा आणि नंतर नाणार असं मुख्यमंत्र्यांनी प्रतिउत्तर दिल आहे.

नाणारचा प्रस्तावित ग्रीन रिफायनरी हा समुद्र किनाऱ्यावरील प्रकल्प असून तो विदर्भात आणणे अशक्य आहे. त्यामुळे जर हा प्रकल्प विदर्भात आणावयाचा असल्यास आधी समुद्र आणावा लागेल’, असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला.

रत्नागिरीतील नाणार येथील रिफायनरी प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात आहे. जमीन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करण्यावरून आधीच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला तोंडघशी पाडलं असताना पुन्हा नाणार प्रकल्प विदर्भात घेऊन जाण्याच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंना चिमटा काढला आहे. भाजपचे काटोलचे आमदार आशीष देशमुख यांनी नाणार ‘विदर्भात हा प्रकल्प आणावा’, अशी मागणी केली. दुसऱ्याच दिवशी आशीष देशमुख यांनी उद्धव यांची मातोश्री येथे भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी पावसाळी अधिवेशनावरून सरकारची कोंडी करणारा प्रश्न उपस्थित करून निशाणा साधला. प्रकल्प विदर्भात नेत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आधी जाहीर करावे, त्यानंतर पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्यासाठी देऊ, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती.

devendra fadnavis attacks on shiv sena president uddhav thackeray over nanar