नाशिक: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून यात्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली आहे. सत्ताधारी भाजपनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा आता अंतिम टप्प्यात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आयोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली . नरेंद्र मोदींच्या सभेनिमित्त भाजपाचे दिग्गज नेते नाशिकमध्ये उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना संधी देण्याचं आवाहन केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही नरेंद्र मोदी यांनी टीका केली. मतांसाठी शरद पवारांकडून काश्मीर मुद्द्यावर अपप्रचार केलं जाणं दुर्देवी असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. “काँग्रेस गोंधळलं आहे हे समजू शकतो. पण शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता काही मतांसाठी चुकीचं विधान करत असेल तर फार दुख होतं. शरद पवारांना शेजारी देश चांगला वाटतो. ही त्यांची इच्छा. तेथील नेते त्यांना कल्याणकारी वाटतात. पण हे संपूर्ण देशाला माहिती आहे की, दहशतवाद्यांची फॅक्टरी कुठे आहे ? हिंसाचार शोषण झाल्याचे फोटो कुठून येतात ?,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
राम मंदिराचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. न्यायालय प्रकरण ऐकून घेत आहे. हे वाचाळवीर कुठून टपकतात माहीत नाही. का ते या प्रकरणामध्ये अडचण निर्माण करू पाहत आहेत? सर्वोच्च न्यायालय, बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर आणि न्यायप्रणालीवर आपला विश्वास असायला हवा. या नाशिकच्या पवित्र जमिनीवरून मी अशा वाचाळवीरांना हात जोडून विनंती करतो की, रामासाठी, देवासाठी डोळे बंद करून न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवावा.
काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राम मंदिराची मागणी रेटली होती. जम्मू-काश्मीरसाठीचे ३७० कलम रद्द करताना केंद्र सरकारने जसे धाडसी पाऊल उचलले, तसेच पाऊल अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यासाठी उचलत त्यासाठी कायदा करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. मोदींचा हा वाचाळवीरांचा टोला अप्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांना असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात होते.
PM Modi in Nashik, Maharashtra: I am astonished where did these ‘bayan bahadur’ come from? Why are they creating obstacles? We should trust Supreme Court, the Constitution & judiciary of India. I request these people to trust the judiciary of India, for God’s sake. https://t.co/ELgPvP7XB5
— ANI (@ANI) September 19, 2019
