मुंबई : सध्या भाजपसोबत केंद्रात आणि राज्यात सत्तेत सामील असलेली शिवसेना आणि त्यांच्या डझनभर मंत्र्यांनी त्यांच्या अखत्यारीतील खात्यांमार्फत राज्यातील जनतेसाठी कोणती विकासाची कामं केली ते माहित नसल्याने शिवसेना हळुवार पणे भावनिक मुद्यांकडे वळत असल्याचे चित्र आहे. आज शिवसेनेचा ५२ वा वर्धापन दिन असल्याने, मुंबईतील गोरेगावमध्ये शिवसेना नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
आज कार्यकर्त्यांना संबोधित करताना युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा स्वबळाचा नारा दिला आहे. परंतु मिळालेल्या सत्तेचा महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणता उपयोग केला याबद्दल त्यांनी कोणताही शब्द काढला नाही.
आपण कोणाच्याही जीवावर मोठे झालेलो नाही तसेच शिवसेना संपूर्ण देशभर पोहचवायची आहे असं उपस्थितीतांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले. आधी ८० टक्क्यावर असलेलं शिवसेनेचं समाजकारण हे आदित्य ठाकरेंनी थेट १५० टक्क्यांवर गेलं असल्याचा दावा केला. परंतु सत्तेतील सहभागी शिवसेनेच्या डझनभर मंत्र्यांनी मागील ४ वर्षात किती टक्के विकासाची तसेच पायाभूत सुविधांची कामं राज्यातील जनतेसाठी केली याचा कोणताही आकडा त्यांनी सादर केला नाही.
मुळात पक्षाने आयोजित केलेली रक्तदान शिबीर किव्हा इतर उपक्रम हे वेगळे विषय असतात. परंतु आपल्या राज्यातील व केंद्रातील १२-१३ मंत्र्यांनी प्रशासनातून महाराष्ट्रातील जनतेसाठी कोणत्या राज्यस्तरीय पायाभूत सुविधा उभारून जनसेवा केली याचा कोणताही आकडा पक्षाकडे नसावा, त्यामुळे सध्या भावनिक मुद्याकडे लक्ष वळविण्याचे कार्यक्रम सुरु असल्याचं एकूणच चित्र आहे.
