मुंबई : भाजप आमदार राम कदम यांनी महिलांबाबत भर दहीहंडी उत्सवात विवादित वक्तव्य केलं होत. मात्र राज्यभर तीव्र पडसाद उमटल्यावर माताभगिनींची ट्विटर वरून टिवटिव करत ‘डिजिटल माफी’ माफी मागून वेळ मारून घेतली आहे. त्यामुळे भविष्यात काही करा आणि ट्विट करून विषय मिटवा, असा ट्रेंड राजकारणात सुरु झाल्यास नवल वाटायला नको.
मागील दोन दिवसांपासून राज्यभर तीव्र पडसाद उमटल्याने आणि भाजपवर दबाव वाढू लागल्याने, अखेर आज आमदार राम कदम यांनी केवळ एक ट्विट करत विषय संपविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु जे वक्तव्य खुलेआम करताना जराही लाज न वाटणाऱ्या राम कदमांनी महिलांची डिजिटल माफी मागितली आहे.
मतदारसंघातील महिलांकडून वोटबँकेच्या चातुर्यातून राख्या बांधून घ्यायच्या तसेच होलसेलमधल्या साड्या व मिठाई वाटायच्या आणि त्याच मतदारसंघात दहीहंडी उत्सव आयोजित करून, त्याच मतदारसंघातील तरुणांना ‘तुम्हाला एखादी मुलगी आवडली आणि जर तुमच्या घरच्यांची पसंती असेल तर मी तिला पळवून घेऊन येईन आणि तुम्हाला देईन’ असा विकृत संदेश देणाऱ्या राम कदमांनी महिलांची केवळ डिजिटल माफी मागितली आहे.
काय ट्विट केलं आहे आमदार राम कदम यांनी?
माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली . झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुनःश्च
माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे.@ANI— Ram Kadam (@ramkadam) September 6, 2018
