अमरावती : मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात देशाला काय आर्थिक फायदा झाला यावर पंतप्रधानांनी थेट माझ्याशी चर्चा करावी असे खुले आव्हान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडूंनी नरेंद्र मोदी यांना दिले आहे. मंगळवारी पंतप्रधान मोदींनी एअनआय’ला दिलेल्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात देशाने अपेक्षित आर्थिक वाढीचा दर गाठला का? असा सवाल सुद्धा उपस्थित केला.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले की, तत्कालीन काँग्रेसप्रणित यूपीए सरकारच्या कार्यकाळात सुद्धा आर्थिक वाढीचा दर चांगला नसेल. परंतु, या मोदी सरकारच्या काळातही हा चांगला नाही हे मान्य करावे लागेल. GST आणि नोटाबंदीमुळे आर्थिक वाढ झाली का, असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला.
मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे भारताची आर्थिक प्रणाली उद्ध्वस्त झाल्याचा सणसणीत आरोप त्यांनी केला. दरम्यान, आर्थिक मुद्यांवर मोदींनी माझ्याशी खुली चर्चा करावी, असे थेट आव्हान सुद्धा त्यांनी मोदींना दिले.
