नवी दिल्ली : अखेर अण्णांनी आज रणशिंग फुंकले, शहीद दिनाचे औचित्य साधून अण्णांचा आज लोकपाल विधेयकासाठी सत्याग्रह आंदोलन सुरु आणि मोदीसरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
अण्णांनी लोकपाल विधेयकासाठीच सत्याग्रह आंदोलन सुरु करून मोदीसरकार वर सुद्धा दबाव आणला आहे. आज शहीद दिनीच अण्णांनी लोकपाल विधेयकासाठी एल्गार पुकारला आहे. आज दिल्लीत रामलीला मैदानावर अण्णा सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात करणार आहेत.
देशहितासाठी जनलोकपाल, निवडणूक सुधारणा आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोदीसरकारचे लक्ष वेधण्यासाठीच अण्णांनी हा सत्याग्रह आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. आज सकाळी अण्णा महाराष्ट्र सदनातून राजघाटाकडे प्रयाण करतील आणि शहीदांच्या स्मृतीला अभिवादन करून त्यांच्या आंदोलनाला सुरुवात करतील. अण्णांच्या आंदोलनाला लोकांनी येऊ नये म्हणून सरकारने गाड्या रद्द केल्या असा आरोप सुद्धा अण्णांनी महाराष्ट्र सदनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
राज्य तसेच केंद्र सरकारकडून अण्णांना आंदोलन मागे घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले परंतु अण्णा आंदोलनावर ठाम आहेत. कारण काल उशिरा मध्यरात्री पर्यंत ते प्रयत्न सुरु होते. महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी काल रात्री अण्णांबरोबर महाराष्ट्र सदनात चर्चा केली आणि सरकार कृषी मूल्य आयोगास स्वायतत्ता देण्याच्या मागणीवर सकारात्मक आहे असा संदेश दिला. तरी अण्णा हजारे त्यांच्या आंदोलनावर ठाम होते. त्याआधीही महाराष्ट्रात असताना गिरीश महाजन यांनी अण्णांच मन वळवण्याचा प्रयत्न केला होता जे असफल ठरले.
