नाशिक : एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ख्याती असलेले छगन भुजबळ आणि राज ठाकरे हे महाराष्ट्राला चांगलेच परिचित आहेत. परंतु ईडी च्या चौकशीच्या जाळ्यात अडकलेल्या भुजबळ समर्थकांना अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दारी आपली कैफियत मांडावीशी वाटत आहे.
बऱ्याच दिवसांपासून ईडी च्या जाळ्यात अडकलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना काही केल्या जामीन मंजूर होताना दिसत नाही आहे. काही दिवसांपूर्वी समता परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची बीड येथे भेट घेतली होती आणि त्यावर होकारात्मक उत्तर ही दिलं होतं असं त्यांच्या समर्थकांनी सांगितले होते.
महाराष्ट्र सरकार जाणीव पूर्वक त्यांच्या जामिनास विरोध दर्शवत आहे. संपूर्ण प्रकरण हे राजकीय हेतूने प्रेरित असून त्यासाठी नैसर्गिक कायदाही पाळला जात नसल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत.
अखेर भुजबळांवरील अन्यायाची चर्चा आता राज ठाकरेंच्या दारी घेऊन जाण्याचे भुजबळ समर्थकांनी ठरवले असून तशी भेट देण्याची विनंतीही राज ठाकरेंच्या कार्यालयाशी केल्याचे त्यांचे समर्थक म्हणाले. राज ठाकरे हे एक परिपक्व नैतृत्व म्हणून ख्यात असून, किती ही राजकीय वाद असले तरी कोणावर ही व्यक्तिगत रोष कायम ठेवत नाहीत हा त्यांचा मूळ स्वभावच आहे.
परंतु नेहमीच कोणतीही आणि कोणाचीही पर्वा न करता रोखठोक भूमिका घेणारे राज ठाकरे हे राजकारणात सर्वश्रुत आहेत, त्यामुळेच जर राज ठाकरेंनी या विषयावर काही भूमिका घेतल्यास प्रसार माध्यमही तो विषय उचलून धरतात हे भुजबळ समर्थकांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळेच छगन भुजबळांचा हा विषय अखेर ‘राज दरबारी’ घेऊन जाण्याचे भुजबळ समर्थक आणि समता परिषदेने ठरवल्याचे कळते.
