नवी दिल्ली : इंधन दरवाढ तसेच वाढत्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसनं ‘भारत बंद’ची हाक आज दिली होती. देशभरातील जवळपास २१ पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला होता. या बंदला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून भाजपने दुपारीच घाईघाईत पत्रकार परिषद आयोजित केली होती. दरम्यान, भाजपाचे नेते आणि केंद्रीय कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे पेट्रोल – डिझेल तसेच इतर इंधनाचे दर वाढले आहेत, असं स्पष्ट करून आमच्या हातात काहीच नाही असा थेट संदेश देऊन हात वर केले आहेत.

पुढे प्रतिक्रिया देताना रवी शंकर प्रसाद म्हणाले की, आम्ही जनतेसोबत आहोत आणि सामान्यांच्या त्रासाची आम्हाला पूर्ण कल्पना आहे, परंतु पेट्रोल – डिझेलचे दर नियंत्रित करणे आमच्या हातात नाही असं सांगत पूर्णपणे हात झटकले आहेत. विरोधक रस्त्यावर उतरले असले तरी आज देशात काय सुरू आहे? पेट्रोल पंपांवर तोडफोड सुरू आहे. बसेस जाळल्या जात आहेत. त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे,’ असं भावनिक विधान पुढे करत मूळ महागाईच्या विषयाला बगल देण्याचा केविलवाणा प्रयत्नं त्यांनी पत्रकार परिषदेत केला. काँग्रेस पक्ष सध्या नैराश्याच्या गर्तेत सापडला आहे. त्यातूनच त्यांनी भारत बंदची हाक दिल्याचा टोला रवी शंकर प्रसाद यांनी लगावला. परंतु सरकार नेमकं सर्व महागाई कमी करण्यासाठी काय उपाय योजना करणार यावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

वास्तविक, याच मुद्यावर म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने देशभर इंधन दरवाढ तसेच वाढत्या महागाईमुळे काँग्रेसविरुद्ध आक्रमक आंदोलन केलं होत. त्यावेळी मोदीं’सकट भाजपचे सध्याचे सर्वच दिग्गज नेते मैदानात उतरले होते. इंधन दरवाढ आणि महागाईवरून भाजपने देशभर काँग्रेसविरुद्ध जोरदार आघाडी उघडली होती. इतकच नव्हे तर २०१४ मधील लोकसभा निवडणुकी दरम्यान ‘बहुत हुई जनता पर पेट्रोल – डिझेल की मार, अबकी बार मोदी सरकार’ अशी घोषवाक्य देत प्रचार करून सत्तेत आले. परंतु मोदी सरकारच्या काळात महागाई आणि इंधनांचे दर यूपीएच्या राजवटीपेक्षा सुद्धा भयानक पातळी गाठत आहेत. परंतु आज त्याच मुद्यावर जेव्हा काँग्रेसने देशभर आंदोलन पेटवलं असता, भाजपने ‘इंधनाचे दर नियंत्रित करण आमच्या हातात नसल्याचे’ उत्तर देऊन सर्वानाच आश्चर्यचकित केलं आहे. याचा अर्थ २०१४ पूर्वी जेव्हा भाजपने काँग्रेसविरुद्ध आंदोलन छेडलं होत तेव्हा काय इंधनाचे दर ‘१० – जनपथ’ वरून निश्चित व्हायचे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

BJP deny from controlling increasing rates of petrol and diesel in the country