रत्नागिरी : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी रत्नागिरी येथे भाजपच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन केले . दरम्यान, आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नाणार विषयावर बोलताना ‘नाणार प्रकल्प काही झाले, तरी आम्ही करणार’ असं धक्कादायक विधान केलं आणि त्यामुळे भाजप विरोधात कोकणात संतापाची लाट येण्याची शक्यता आहे.
रत्नागिरीतील नाणार ग्रीन रिफायनरीचा फायदा, तोटा नंतर पाहू, पण नाणार आम्ही करणार. कोकणातील स्थानिक लोकांच्या भूमिकेचा आदर करून जमीनमालकांना निवडणुकीपूर्वी मोबदला जाहीर करू, अशी पक्षाच्या वतीने नाणारबाबतची भाजपची भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान स्पष्ट केली आणि सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. आधीच स्थानिकांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध
याआधी मनसे, शिवसेना आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने सुद्धा नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधी भूमिका घेतली आहे. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पच्या ठिकाणाला भेट देऊन उपस्थितांना संबोधित केलं होत आणि प्रकल्पाला जाहीर विरोध दर्शविला होता. तर आमदार नितेश राणे यांनी राजापूरमध्ये भव्य मोर्चा काढून तीव्र विरोध दर्शविला होता.
आधीच स्थानिकांचा प्रकल्पाला तीव्र विरोध असून त्यांनी जमिनी देण्यास विरोध दर्शविला आहे. इतकंच नाही तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जर स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्प लादला जाणार नाही अशी भूमिका घेतली होती. परंतु आज भाजपचे आमदार प्रसाद लाड रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले असता भूमिका मांडली की, ‘नाणार प्रकल्पाबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. देशातील हा सर्वांत मोठा प्रकल्प आहे. रोजगारापासून संपूर्ण अर्थव्यवस्था बदलणार आहे. त्यामुळे नाणार प्रकल्प काही झाले, तरी आम्ही करणार’ अशी भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेवेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, संदेश पारकर आदी उपस्थित होत.
